Pandharpur LIVE 12 March 2019
महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे पाटील यांनी केलेला भाजप प्रवेश काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी फारच गांभीर्याने घेतला आहे. या घडामोडीमुळे राहुल गांधी संतप्त झाले असून अशोक चव्हाण आणि राधाकृष्ण विखे यांची त्यांच्या पदावरून गच्छंती निश्चित मानली जात आहे.
📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.
➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूरMail- livepandharpur@gmail.com
राहुल गांधी तसेच काँग्रेस श्रेष्ठींनी मोठ्या विश्वासाने अशोक चव्हाण आणि राधाकृष्ण विखे यांच्याकडे अनुक्रमे प्रदेशाध्यक्ष आणि विरोधी पक्षनेतेपद बहाल केले होते. मात्र या दोघांनाही आपल्या पदांना न्याय देता आलेला नाही. संघटन विस्तार आणि सरकारला धारेवर धरण्यात हे दोन्ही नेते अपयशी ठरले. त्यातच विरोधी पक्षनेत्याचाच मुलगा भाजपला जाऊन मिळाल्यामुळे राहुल गांधी कमालीचे नाराज झाले असल्याचे काँग्रेसच्या वरिष्ठ गोटातील सूत्रांनी सांगितले.
लोकसभा निवडणूक आता अवघ्या एक महिन्यावर येऊन ठेपली आहे. काँग्रेसला विजय मिळवून देण्यासाठी सोनिया, राहुल आणि प्रियांका गांधी जीवाचे रान करीत आहेत. पाटीदार आंदोलन पेटवून गुजरातमध्ये नरेंद्र मोदींसमोर आव्हान निर्माण करणारा हार्दिक पटेल काँग्रेसमध्ये दाखल झाला आहे. खासदारांच्या संख्येच्या दृष्टीने महाराष्ट्र हे मोठे राज्य आहे. त्यामुळे काँग्रेसला महाराष्ट्राकडून मोठ्या अपेक्षा आहेत.
मात्र सद्यस्थितीत विरोधी पक्षनेत्याचाच मुलगा भाजपाला जाऊन मिळाला, त्यामुळे भाजपविरोधात जनतेसमोर कोणत्या तोंडाने जायचे, असा प्रश्न काँग्रेस श्रेष्ठींना पडला आहे. नगर दक्षिणच्या जागेवर राष्ट्रवादीशी सकारात्मक चर्चा करण्यात दोन्ही नेत्यांना अपयश आल्याची काँग्रेस श्रेष्ठींची भावना आहे. सुजय विखे यांचा भाजप प्रवेश ही एका दृष्टीने संपूर्ण काँग्रेससाठी नामुष्कीची बाब ठरली आहे. त्यामुळेच अशोक चव्हाण आणि राधाकृष्ण विखे यांची गच्छंती करण्याच्या निर्णयापर्यंत काँग्रेस श्रेष्ठी आले आहेत. हा निर्णय निवडणुकीच्या तोंडावर किंवा निवडणुकांच्या नंतर घेतला जाईल, असे सूत्रांचे म्हणणे आहे.



