👁 10 Views

भारताचे सर्व सामने पाहणार!: मल्ल्या

नवी दिल्ली

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील भारत-पाकिस्तान सामन्याला हजेरी लावून खळबळ उडवून देणारा फरार उद्योगपती विजय मल्ल्या हा भारतीय मीडियात त्याच्याबद्दल आलेल्या बातम्यांमुळं चिडला आहे. ‘भारतातील मीडिया माझ्याबद्दल उगाचच सनसनाटी निर्माण करतोय. त्यांचे हे उद्योग पाहून यापुढच्या भारताच्या सर्व सामन्यांना उपस्थित राहण्याचा मी विचार करतोय,’ असं ट्विट त्यानं केलं आहे.

भारतीय बँकांचे हजारो कोटी बुडवून देशाबाहेर पळालेला मल्ल्या सध्या इंग्लंडमध्ये वास्तव्यास आहे. बर्मिंगहॅम येथील एजबस्टन स्टेडियमवर रविवारी झालेला भारत-पाक सामना मल्ल्यानं व्हीआयपी स्टँडमध्ये बसून पाहिला. भारतातील इलेक्ट्रॉनिक व प्रिंट मीडियानं त्याबद्दल मोठ्या प्रमाणावर बातम्या प्रसारित केल्या. सोशल मीडियातही दिवसभर त्याचे वेगवेगळे फोटो टाकून कॉमेंट्स केल्या जात होत्या. त्यामुळं मल्ल्याची चीडचीड झाली आहे. ट्विटरच्या माध्यमातून त्यानं हा राग काढला आहे. आपल्या ट्विटमध्ये तो म्हणतो, ‘भारत-पाकिस्तान सामना पाहण्यासाठी मी एजबस्टनवर गेलो होतो. मीडियानं ते जास्तच मनावर घेतलेलं दिसतंय. माझ्या उपस्थितीबद्दल सनसनाटी बातम्या दिल्या जाताहेत. हे सगळं पाहून मी ठरवलंय की, यापुढच्या सर्व सामन्यांना उपस्थित राहून भारताला प्रोत्साहन द्यायचं.’


पुढच्या ट्विटमध्ये मल्ल्यानं भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. ‘विराट हा जगातील एक सर्वोत्तम खेळाडू, सर्वोत्तम कर्णधार व सर्वोत्तम माणूस आहे,’ असं त्यानं म्हटलंय.
भारताच्या पुढील सर्व सामन्यांना उपस्थित राहणार असल्याचं जाहीरपणे सांगून मल्ल्यानं एक प्रकारे भारत सरकारलाच डिवचण्याचा प्रयत्न केल्याचं बोललं जात आहे.


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *