Pandharpur Live- संपूर्ण देशात करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आलं आहे. लोकांनी बाहेर पडू नये असे प्रशासनाकडून वारंवार आवाहन केले जात आहे. मात्र, काहीजण विनाकारणच घराबाहेर पडत आहेत. अशा लोकांना सुरुवातीला पोलिसी दंडुक्याचा प्रसादही मिळाला आहे.मात्र, यातूनही काहींनी बोध घेतलेला दिसत नाही. याचा विचार करुनच पंढरीत डीवायएसपी डॉ. सागर कवडे यांनी नियम तोडुन घराबाहेर पडणार्यांच्या माथ्यावर बुक्का लावुन हरिपाठाचे पठण करण्याचा सल्ला देत नियमभंग करणार्यांच्या डोळयात अंजन घालण्याचा प्रयत्न केला. आत्ता तरी यापासुन बोध घेत नागरिक घराबाहेर पडणार नाहीत अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
यावर उपाय म्हणून पंढरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे यांनी अनोखी शक्कल लढवली. यंदा करोनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात लॉकडाऊन केले आहे. मात्र, तरीही विनाकारण घराबाहेर फिरणार्यांवर पोलिसांनी कारवाई ऐवजी अनोख्या पद्धतीनं प्रबोधन केलं. दुचाकीस्वारांच्या कपाळाला बुक्का लावून त्यांना अभंग गायला लावले. त्याचबरोबर विनाकारण घराबाहेर पडू नका असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे यांनी केले.
शहरातील मुख्य ठिकाणी विनाकारण फिरणार्या दुचाकीस्वारांना त्यांनी थांबवले. त्यानंतर रणजीत पाटील, अभिजित कांबळे या पोलीस कर्मचार्यांनी त्यांच्या कपाळावर बुक्का लावला. तर प्रसाद औटी यांनी त्यांना हरिपाठ आणि तुकोबांचे अभंग म्हटले आणि नियम मोडणार्यांनाही म्हणण्यास सांगितले. त्यानंतर त्यांनी मिळून विठुरायाचा जयघोष केला.

