सावित्रीबाई फुले जयंती निमित्त
स्री शिक्षणाच्या पुरस्कर्त्या आणि स्त्रीमुक्ती चळवळीच्या प्रणेत्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा 3 जानेवारी हा जन्म दिवस विविध कार्यक्रमांनी साजरा केला जात आहे. 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला. वयाच्या नवव्या वर्षी ज्योतीराव फुले यांच्याशी त्यांचा विवाह झाला. ज्योतिबा फुल्यांच्या समवेत शेती करता करता सावित्रीबाई साक्षर बनल्या

शिक्षणाच्या प्रसारासाठी अन्य सामाजिक क्षेत्रांतही काम करणे गरजेचे आहे, स्त्रियांचा आत्मविश्वास वाढवणे गरजेचे असल्याचे ओळखून त्यांनी स्त्री शिक्षण आणि स्त्रीमुक्त क्षेत्रातही काम केले. परंपरागत रुढींना फाटा देऊन हे काम जोमाने सुरु करुन काही अनिष्ठ रुढी बंद करण्यासाठी प्रयत्न केले. बाला-जरठ विवाह प्रथेमुळे अनेक मुली वयाच्या बारा-तेराव्या वर्षी विधवा व्हायच्या. ब्राह्मण समाजात विधवा-पुनर्विवाह अजिबात मान्य नव्हता. पतीच्या निधनानंतर अशा विधवांना सती जावे लागे किंवा मग त्यांचे केशवपन करुन कुरुप बनविले जाई. विरोधाचा अधिकार नसलेल्या या विधवा मग कुणाच्यातरी शिकार बनत. गरोदर विधवा म्हणून समाज छळ करणार, जन्माला येणार्या मुलाला यातनांशिवाय काहीच मिळणार नाही अशा विचारांनी या विधवा आत्महत्या करत. जोतिरावांनी या समस्येवर उपाय म्हणून बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले. सावित्रीबाईंनी ते समर्थपणे चालवले. फसलेल्या वा बलात्काराने गरोदर राहिलेल्या विधवांचे त्या बाळंतपण करत. गृहातील सर्व अनाथ बालकांना सावित्रीबाई आपलीच मुले मानत. याच ठिकाणी जन्मलेल्या काशीबाई या ब्राह्मण विधवेचे मूल त्यांनी दत्तक घेतले. त्याचे नाव यशवंत ठेवले. सावित्रीबाईनी जोतिबांच्या सर्व कार्यात हिरीरीने भाग घेतला स्त्रियांनी शिकावे हे त्यांचे ब्रीद वाक्य होते. अनाथांना आश्रय मिळवा हेही त्याचे कार्यक्षेत्र होते. सामजिक कार्यात त्यांचा पुढाकार असे.
केशवपन प्रथा बंद करण्यासाठी नाभिक समाजातील लोकांचे प्रबोधन करणे व त्यांचा संप घडवून आणणे, पुनर्विवाहाचा कायदा व्हावा यासाठी प्रयत्न करणे अशी अनेक कामे सावित्रीबाईंनी कल्पकतेने पार पाडली. सत्यशोधक समाजाच्या कार्यातही सावित्रीबाईंचा मोठा सहभाग असे. महात्मा फुले यांच्या निधनानंतरही सावित्रीबाईंनी सत्यशोधक समाजाच्या कार्याची धुरा वाहिली. पोटासाठी शरीर विक्रय करणार्या बाया-बापड्यांना दुष्टांच्या तावडीतून सोडवून त्यांनी त्यांना सत्यशोधक कुटुंबांत आश्रयास पाठविले. त्यांच्या कार्याला हातभार म्हणून पंडिता रमाबाई, गायकवाड सरकार अशा लोकांनी मदतीचा हात पुढे केला.
स्त्री शिक्षण क्षेत्रातील महत्वपुर्ण कामगिरीबरोबरच सावित्रीबाईंनी साहित्य क्षेत्रातही भरीव काम केले. आपल्या विचारांचा प्रसार त्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातूनही केला. ‘काव्यफुले’ व ‘बावनकशी सुबोध रत्नाकर’हे काव्यसंग्रह त्यांनी लिहिले. पुढील काळात त्यांची भाषणेही प्रकाशित करण्यात आली. त्यांनी दर्जेदार कवितांबरोबरच पत्रलेखन आणि निबंध लेखन केल आहे. सावित्रीबाईना प्रसिद्धीचा मुळीच हव्यास नव्हता. ज्योतीबांचे मित्र मोरो विठ्ठल वाळवेकर यांनी सुरु केलेल्या ‘गृहिणी’ या मासिकात त्या लेख लिहीत असत. परंतु हे लेख त्या आपल्या नावाने प्रसिध्द न करता टोपण नावाने वा मैत्रिणीच्या नावाने प्रसिध्द करीत असत. विद्यार्थिनीचा सावित्रीबाईला विशेष लळा होता. शाळेची व स्वत:जवळची पुस्तके त्या विद्यार्थीनीना वाटत व त्याना घरी बोलावून जेवण देत असत. स्त्रीशिक्षण व स्त्री मुक्ती चळवळ उभारुन समस्त महिलांना आधार दिला. त्यांच्यात जिवनाविषयी जिद्द आणि उमेद निर्माण केली. महिला, अनाथ, गोरगरिबांसाठी आयुष्य वेचणाऱ्या सावित्रीबाईचे 10 मार्च 1897 मध्ये प्लेगमुळे निधन झाले.
एकनाथ पोवार
माहिती सहायक
उप माहिती कार्यालय, पंढरपूर.