गोपाळकाल्याने आषाढी वारीची सांगता.. पालख्यांचा परतीचा प्रवास सुरु

पंढरपूर (भगवान वानखेडे):-  गोपाळ काला गोड झाला। गोपाळाने गोड केला ॥ या जयघोषात  गोपाळपूर  दुमदुमून गेले होते. ज्ञानेश्वर माऊली तुकारामच्या गजरात  गोपाळपुरात मानाच्या सात पालख्यासह सर्व संतांच्या पालख्या दाखल झाल्या आणि गोपाळकाल्याने आषाढी वारीची सांगता झाली. जातो माघारी पंढरीनाथा। तुझे दर्शन झाले आता॥ म्हणत जड अंत:करणाने संतांच्या पालख्यांनी व वारकर्‍यांनी आज पंढरीचा निरोप घेतला. ज्यांचे दर्शन होणे बाकी आहे असे वारकरी मात्र अजुनही पंढरीत वास्तव्यास आहेत.
             संत ज्ञानेश्‍वर महाराज व जगद्गुरू संत तुकाराम महाराज, संत गोरोबा, संत जनाबाई, संत सोपानकाका, संत नामदेव, संत बहिणाबाई, संत मुक्ताबाई, संत एकनाथ, संत निवृत्तीनाथ, संत नरहरी सोनार यांच्या पालख्यासह अन्य संतांच्या पालखीचे  गोपाळपुरात आगमन झाल्यानंतर व पालखी विसावल्यानंतर  गोपाळपूर ग्रामपंचायतीच्यावतीने पूजा करण्यात आली
 श्री विठ्ठलाची आणि संतांची भेट
            पालख्यांनी गोपाळकाला गोड केल्यानंतर मानाच्या सात पालख्या श्री विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी विठ्ठल मंदीरात आल्या. आषाढी वारीच्या सोहळ्यात विठ्ठल दर्शनाची आस पुर्ण झाल्यानंतर या पालख्यांचा परतीचा प्रवास सुरु झाला. मानाच्या सात पालख्यांमध्ये  संत निवृत्तीनाथ, संत सोपानकाका, संत मुक्ताबाई, संत एकनाथ, संत नामदेव, संत ज्ञानेश्‍वर माऊली व जगद्गुरू संत तुकाराम महाराज या मानाच्या  सात पालख्या आहेत.
 तत्पूर्वी मंदीर समितीच्यावतीने उपविभागीय अधिकारी संजय तेली यांच्या हस्ते  पादुकांचे पुजन व मानाच्या  पालख्यांच्या मानकर्‍यांचा सत्कार  करण्यात आला. यावेळी  व्यवस्थापक विलास महाजन यांच्यासह मंदीर समितीचे कर्मचारी व पालख्यांचे मानकरी, फडकरी व भाविक उपस्थित होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *