रिलायन्स जिओच्या इंटरनेट आणि इतर मोबाईल प्लॅन्सने सध्या मोबाईल क्षेत्रात अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. ग्राहकांना मोफत सुविधा देण्याच्या या योजनांमुळे ग्राहक अतिशय कमी कालावधीत इतर कंपन्यांकडून जिओकडे आकर्षित झाला आहे. मात्र जिओने नुकतेच बाजारात आणलेले आपले काही टेरीफ प्लॅन हे टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरीटी ऑफ इंडिया (ट्राय)च्या नियमांमध्ये बसणारे नसल्याचा आरोप व्होडाफोन कंपनीने आज दिल्ली उच्च न्यायालयात केला आहे.
नुकतेच रिलायन्सने २ नवीन टेरीफ प्लॅन्स बाजारात आणले आहेत. यामधील ‘समर सरप्राईज ऑफर’ प्लॅनमध्ये ग्राहकांनी किमान ४०२ रुपयांचे रिचार्ज केल्यावर त्यांना ३ महिन्यांची कॉम्प्लिमेन्ट्री सर्व्हीस देण्यात येणार आहे. याशिवाय ‘धन् धना धन्’ ही ऑफर समर सरप्राईज ऑफर संपल्यानंतर मिळणार आहे. यामध्ये ४०८ रुपयांचा रिचार्ज केल्यावर ग्राहकाला आणखी दोन महिने रिलायन्सची सेवा वापरता येणार आहे.
रिलयन्स जिओकडून ग्राहकांना देण्यात येणाऱ्या इंटरनेटच्या मोफत सुविधेसंदर्भातही व्होडाफोनने दिल्ली उच्च न्यायालयात खटला दाखल केला होता. न्यायाधीश संजीव सचदेव यांच्या खंडपीठाकडे ही याचिका दाखल करण्यात आली होती. जिओच्या ऑफर्समुळे इतर मोबाईल कंपन्यांचे धाबे दणाणले आहे. त्यामुळे व्होडाफोनने जिओच्या विरोधात अशाप्रकारची तक्रार दाखल केली आहे.
मात्र दुसरीकडे रिलायन्स कंपनीने आपल्यावर कऱण्यात आलेले आरोप फेटाळून लावले आहेत. आपण ट्रायच्या नियमांचे उल्लंघन केले नसल्याचे रिलायन्सने म्हटले आहे. व्होडाफोनने दाखल केलेल्या खटल्याची सुनावणी २७ जुलै रोजी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे मोबाईल कंपन्यांची आपापसात वाढणारी स्पर्धा अखेर न्यायालयातही गेली आहे. या खटल्यामध्ये दोन्ही कंपन्या आपली बाजू कशा पद्धतीने मांडतात आणि रिलायन्सने खरच ट्रायचे नियम मोडले आहेत की नाही ते स्पष्ट होईल.
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111




