मुंबई. ( शाहरुख मुलाणी ) – केंद्र आणि राज्य सरकारने भूलथापा मारून शेतकऱ्यांना देशोधडीस लावले असून या लुच्च्या सरकारला निवडून दिल्याचा पश्चाताप होतोय, अशी खंत स्वभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केली. आत्मक्लेश यात्रेचा आजचा पाचवा दिवस तब्बल 90 किमीचे अंतर पार केले. खोपोली येथे पदयात्रेचे जंगी स्वागत करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
मोदी सरकारने अच्छे दिनाच्या थापाच मारल्या. शेतकरी अतिशय दरिद्री अवस्थेत असताना देखील त्याच्याकडे पहायला कुणालाच वेळ नाही. आम्ही काय गुन्हा केलाय ? उद्योगपतींना कर्ज माफ करताय, मग आमच्या शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्यायला तुम्हाला काय लखवा मारला काय ? वर सांगताय की पैसे नाहीत म्हणून. एकीकडे सरकार आज तीन वर्षे पूर्ण केल्याचा उत्सव साजरा करत आहेत. याच मोदी सरकारच्या शायनींग इंडियामध्ये शेतकरी फास लावून घेतो आहे. तीन वर्षात मोदी सरकारने शेतकऱ्यांना कंगाल केले आहे. विकासाचे स्वप्न दाखवून एक एक सत्ता हस्तगत करत आहेत. तर दुसरीकडे शेतीमालाचे भाव पाडले जात आहेत. रविकांत तुपकर म्हणाले, शेतकऱ्यांना कर्ज मुक्त करावे, अन्यथा संघर्ष अटळ आहे. यावेळी कविसंमेलन पार पडले. ज्येष्ठ कवी रामदास फुटाणे यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर कविता रचून उपस्थित कार्यकर्त्यांचे डोळे पाणवले. संध्याकाळी ठोंबरेवाडी येथे पदयात्रा मुक्कामी पोहचली. खासदार राजू शेट्टी यांचे पाय सुजू लागले असून पायाला फोड उठले आहेत. तरीही भर उन्हात खासदार राजू शेट्टी न थकता पायी चालत आहेत. यावेळी प्रदेशाध्यक्ष प्रा. प्रकाश पोपळे, हंसराज वडगुले, माणिक कदम, योगेश पांडे, राजेंद्र गड्ड्यान्नावर, देवेंद्र भुयार, राजेंद्र ढवाण-पाटील आदी उपस्थित होते
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111





