सांगली – हिंदवी स्वराज्य संकल्पक शहाजीराजे, पुण्यश्लोक जिजामाता आणि हिंदवी स्वराज्य संस्थापक शिवछत्रपतींच्या इच्छेनुसार श्री शिवप्रतिष्ठानच्या धारकऱ्यांनी हिंदवी स्वराज्याचे मोघलांनी लुटून नेलेले ते ३२ मण सुवर्ण सिंहासन पुनर्संस्थापित करण्याचा निर्णय घेतला आहे.
पुनर्स्थापनेचा संकल्प करण्यासाठी सर्व शिवप्रेमींनी दि.३ जून रोजी रायगडावर एकत्र यावयाचे असून रात्री ९ वाजलेपासून संकल्प कार्यक्रमास प्रारंभ होणार असल्याची माहिती श्री शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे (गुरुजी) यांनी पत्रकार बैठकीत दिली.
ते म्हणाले, दि.३ जून रोजी रात्री ९ वाजता सुरु झालेल्या संकल्पाची दि.४ जून रोजी सकाळी ११ वाजता समाप्ती होईल. शिवछत्रपतींनी ३६ वर्षात २८९ लहान-मोठ्या लढाया केल्या. त्यांचे सुवर्ण सिंहासन हिंदूना प्रेरणा देणारे होते.
मोघलांनी आक्रमण करुन रायगडावरील ३२ मण सोन्याचे सिंहासन छिन्न-विछिन्न करुन नेले. आम्ही घेतलेल्या निर्णयानुसार हे सिंहासन पुढील पिढीला प्रेरणादायी ठरेल. आमच्या संकल्पनेत निधी आड येणार नाही अशी आम्हाला खात्री आहे. आम्ही निधी संकलनाचा व्यवहार मोदींना अभिप्रेत असा ‘कॅशलेस’ असणार आहे. समाज शिवप्रतिष्ठानइतका विश्वास अन्य कोणत्याही संस्थेवर ठेवणार नाही.
दि.३ रोजी रायगडावर बँक आणि ज्या खात्यावर भरावयाचे आहे ते नाव जाहीर केले जाईल. केवळ रोख स्वरुपातच निधी स्विकारला जाईल. सिंहासन स्थापनेसाठी केंद्र आणि राज्याची अजिबात परवानगी घेणार नाही. शिवछत्रपतींसाठी कोणाचीही परवानगी घेण्याची गरज नाही. सरकारच्या दारात जाणार नाही आणि काहीही मागणार नाही.
शिवछत्रपतींनी दक्षिणेतील पाचही पातशाह्या व उत्तरेतील मुघलशाही यांच्याशी अखंड लढून शालिवाहन शके १५९६ ज्येष्ठ शुध्द त्रयोदशी या दिवशी रायगडावर हिंदवी स्वराज्याचे सिंहासन स्थापन केले.
छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर रायगड मोगली सत्तेच्या हाती पडला. रायगडावरील वास्तू, वस्तू व ऐतिहासिक कागदपत्रे जाळून नामशेष केली होती असेही ते म्हणाले. यावेळी नितीन चौगुले, अविनाश सावंत उपस्थित होते.
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111





