👁 11 Views

मलाही अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे: परेश रावल

मुंबई

प्रसिद्ध लेखिका अरुंधती रॉय यांच्या विरोधात केलेल्या ट्विटमुळं वादात अडकलेले अभिनेते, खासदार परेश रावल यांनी पुन्हा एकदा रॉय यांच्यावर हल्लाबोल केला आहे. ‘भारतीय लष्कर आपल्या टीकेला कधीच प्रत्युत्तर देणार नाही म्हणून अरुंधती रॉय लष्करावर टीका करतात. हिंमत असेल तर त्यांनी ममता बॅनर्जी यांच्याविरोधात बोलून दाखवावं,’ असं खुलं आव्हान रावल यांनी दिलं आहे.

काश्मीरमध्ये दगडफेकीपासून वाचण्यासाठी लष्करानं एका आंदोलकाचा मानवी ढाल म्हणून वापर केला होता. त्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. जवानांच्या या कृत्याची रॉय यांनी निर्भत्सना केली होती. त्यावर प्रतिक्रिया देताना परेश रावल यांनी रॉय यांना लक्ष्य केलं होतं. ‘दगडफेक करणाऱ्या आंदोलकांना जीपला बांधण्याऐवजी अरुंधती रॉयला बांधा,’ असं त्यांनी म्हटलं होतं. त्यावरून वादळ उठल्यानंतर ट्विटर अकाऊंट बंद होण्याच्या भीतीनं त्यांनी ते ट्विट डिलिट केलं. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत आता पुन्हा रावल यांनी त्या मुद्द्यावर भाष्य केलं आहे.
‘रॉय यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा मला अजिबात पश्चात्ताप नाही. भलेही मी ते ट्विट चुकीच्या बातमीच्या आधारे केलं असेल तरी त्यात गैर काही नव्हतं. मी चुकीचा असेन तर, २००२ साली अरुंधती रॉय यांनी गोध्रा हत्याकांडाविषयी जे वक्तव्य केलं होतं, त्याचं काय? त्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य असेल तर ते मलाही आहे. रॉय यांना काश्मीरमध्ये लष्कराच्या जीपला बांधलं तरी त्यांच्यावर कुणी दगडफेक करणार नाहीत. कारण, त्या दगडफेक करणाऱ्यांच्या विचारधारचे समर्थन करतात,’ असं ते म्हणाले. ‘स्वत:ला उदारमतवादी म्हणवणारे लोक माझ्यावर टीका करणार हे अपेक्षितच होतं. पण रॉय यांनी लष्करावर टीका केली तेव्हा हे लोक कुठं होते?. पंतप्रधान मोदी किंवा अन्य कुठल्याही राजकारण्यांवर टीका करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. पण लष्करावर टीका का?,’ असा सवाल त्यांनी केला.


सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *