बालभारती: मराठी व इंग्रजीचे नवे पुस्तक अद्यापही तयार नाही
पुणे- शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तके देणार असल्याचा दावा करणाऱ्या शिक्षण विभागाला यंदा याबाबत माघार घ्यावी लागणार असल्याचे दिसत आहे. यंदा इयत्ता नववीची नव्याने येऊ घातलेली पुस्तके साधारण शाळा सुरु होण्याच्या अठवडाभर आधी बाजारात उपलब्ध असणे गरजेचे असताना ती तयारच झालेली नसल्याचे समोर येत आहे.
राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ (बालभारती) यंदाच्या वर्षी इयत्ता सातवी व नववीची नवी पुस्तके बाजारात आणत आहेत. इयत्ता सातवीची मराठी माध्यमांसह अन्य माध्यमांची जवळपास सर्व पुस्तके बाजारात आली आहेत. राज्यातील शाळा 15 जूनपासून सुरु होत आहे. शाळा सुरु होण्यासाठी अवघा अठवडा उरल्याने सर्वत्र खरेदीसाठी गर्दी होते आहे. मात्र इयत्ता नववीच्या पुस्तकांची छपाई अद्याप पूर्ण झालेली नाही. तसेच नववीच्या इंग्रजीच्या व मराठी या महत्त्वाच्या विषयांची पुस्तके अद्याप तयार झालेली नाहीत. त्यामुळे पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तक उपलब्ध करुन देणाऱ्या शिक्षण विभागाला यंदा त्यांचा शब्द पाळणे जमेल का? असा प्रश्न निर्माण होतो आहे. बालभारतीकडून मराठी माध्यमाच्या पुस्तकांबरोबर इंग्रजी व उर्दू माध्यमातील पुस्तकेही तयार केली जातात. मात्र ती देखील पुस्तके अद्याप ऑनलाईन जाहीर झालेली नाही तसेच बाजारातही उपलब्ध झालेली नाहीत.
यंदाच्या वर्षी अभ्यासक्रम आराखडा जाहीर करण्यास, त्यावर हरकती मागविण्यास उशीर झालेला असल्यामुळे एकूणच पुस्तक तयार करणे व त्याची छपाई करणे या प्रक्रियेला उशीर झालेला होता. त्यामुळेच आता शाळा सुरु होण्यासाठी बरोबर अठवडा शिल्लक असतानाही अद्यापही बालभारतीच्या पुस्तकांचे तयार नसल्याचे दिसून येत आहे.
सातवीची सगळी पुस्तके तयार असून ती बाजारात देखील दाखल झाली आहेत. इयत्ता नववीच्या मराठी आणि इंग्रजीमध्ये ऐनवेळी काही गोष्टींचा अंतर्भाव केला त्यामुळे वेळ लागतो आहे. मात्र सर्व पुस्तके शाळा सुरु होण्याआधी विद्यार्थ्यांना उपलब्ध होतील.
डॉ.सुनिल मगर, संचालक
बालभारती
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111





