नाशिक: शेतकरी संप आंदोलन आता राज्यातच नाही तर देशस्तरावर न्यायचं आहे, असं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे.
शेतकरी आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी ते नाशिकमध्ये सुकाणू समितीच्या बैठकीला आले होते, त्यावेळी ते एबीपी माझाशी बोलत होते.
यावेळी राजू शेट्टी म्हणाले, “शेतकरी आंदोलन आता देशव्यापी करायचं आहे. देशातल्या इतर राज्यांचा दौरा सुरू करणार आहे. स्वामिनाथन आयोगाच्या सूचना लागू करण्यासाठी केंद्र सरकारवर दबाव आणण्यासाठी विरोधी पक्षांना एकत्र आणून, शेतकऱ्यांसाठी त्यांचीही मदत घेणार”
याशिवाय सत्तेतले बदलले मात्र आम्ही तिथेच जनतेच्या सोबत आहोत. सत्तेत राहण्याचा सस्पेन्स लवकरच फोडणार आहे, असंही राजू शेट्टी यांनी नमूद केलं.
तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कायदे पंडित आहेत, मात्र त्यांना त्यांचीच जुनी भाषण पाठवतो, असंही राजू शेट्टी म्हणाले.
पुणतांब्यातील शेतकऱ्यांनी संप मागे घेतला असला तरी नाशिकमधील शेतकऱ्यांचा संप सुरु आहे. शेतकऱ्यांच्या संपाचा आज आठवा दिवस आहे. काही ठिकाणी शेतकऱ्यांचा संप सुरु आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी स्थापन झालेल्या सुकाणू समितीची आज बैठक होणार आहे.
शेतकरी संपावर तोडगा काढण्यासाठी काही दिवसांपूर्वी नव्या सुकाणू समितीची स्थापना करण्यात आली. या समितीच्या आज होणाऱ्या बैठकीमध्ये काय निर्णय घेणार याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.
या समितीमध्ये राजू शेट्टी, बच्चू कडू, रघुनाथदादा पाटील यांच्यासह 21 जणांची नावं आहेत.