👁 8 Views

‘इतरांना शिक्षासवलत का नाही?’

मुंबई

अभिनेता संजय दत्त वर्षभरातील अर्धा काळ पॅरोल किंवा फर्लोवर तुरुंगाबाहेरच होता तर तो शिक्षासवलत मिळण्यासाठी सलग चार महिने तुरुंगात असण्याच्या निकषांमध्ये बसत होता का? त्याच्या चांगल्या वर्तनाचे मूल्यांकन तुम्ही कशाच्या आधारे केले? असे सवाल मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी उपस्थित केले. तसेच संजय दत्तला अशा पद्धतीने शिक्षासवलत दिली असेल, तर मग अन्य कैद्यांनाही ती का दिली जात नाही, असाही प्रश्न न्यायालयाने राज्य सरकारला केला.

संजय दत्तची शिक्षा पूर्ण होण्याच्या १२७ दिवस आधीच २५ फेब्रुवारी रोजी पुण्यातील येरवडा तरुंगातून सुटका करण्यात आली होती. त्याविरोधात दाखल याचिकेवरील सुनावणीवेळी न्यायालयाने हे प्रश्न केले.

चांगल्या वर्तणुकीबद्दल संजयला शिक्षेत सवलतीचा लाभ देण्यात आला, असे सरकारी वकिलांनी सोमवारी सुनावणीदरम्यान सांगितले. तेव्हा न्या. आर. एम. सावंत व न्या. साधना जाधव यांच्या खंडपीठाने विविध प्रश्न उपस्थित केले.

संजयच्या चांगल्या वर्तणुकीचे मूल्यांकन तुम्ही नेमके कसे केले? शिक्षामाफीविषयी निर्णय घेण्याचे अधिकार तुरुंग अधीक्षकांना आहेत की तुरुंग महानिरीक्षकांना? तुरुंग मॅन्युअलप्रमाणे अंतिम निर्णयाचे अधिकार कोणाकडे आहेत? याविषयीची माहिती आमच्यासमोर सादर करा. तसेच संजयविषयी निर्णय घेताना नेमकी कोणती प्रक्रिया अवलंबली, हेही दोन आठवड्यांत प्रतिज्ञापत्रावर मांडा, असे निर्देशही खंडपीठाने सरकारला दिले.

संजय दत्तला त्याच्या चांगल्या वर्तणुकीबद्दल शिक्षेत सूट देण्याचा निर्णय घेऊन शिक्षा पूर्ण होण्याच्या १२७ दिवस आधी २५ फेब्रुवारी रोजी त्याची पुण्यातील येरवडा तरुंगातून सुटका करण्यात आली होती. त्याला प्रदीप भालेकर यांनी अॅड. नितीन सातपुते यांच्यामार्फत उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. ‘तुरुंग मॅन्युअलप्रमाणे कैद्यांना २२ महिन्यांचा तुरुंगवास भोगल्यानंतर अवघ्या १४ दिवसांसाठी फर्लो मिळतो. मात्र, संजयला दोन महिन्यांतच फर्लो देण्यात आला. त्याशिवाय पॅरोलवरही तो अनेकदा तुरुंगाबाहेर होता. अशाप्रकारे वर्षभरात तो पाच महिने बाहेर असूनही त्याला शिक्षेत सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला. राजकीय वरदस्तामुळेच त्याला हा लाभ मिळाला असून तुरुंग अधीक्षक व महानिरीक्षकांनी नियम डावलून त्याच्यावर मेहेरनजर दाखवली असल्याने त्यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी लावावी. तसेच संजयची लवकर सुटका करण्याचा निर्णय रद्द करावा’, अशी विनंती भालेकर यांनी याचिकेत केली आहे.
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *