👁 11 Views

भारतापुढे कडवे आव्हान

बर्मिंगहॅम

भारताकडून २०१५च्या वनडे वर्ल्डकपमधील पराभव बांगलादेशच्या चांगलाच जिव्हारी लागला होता. त्यामुळे त्याची सव्याज परफेड करण्याच्या दृष्टीनेच आज, गुरुवारी बांगलादेश चॅम्पियन्स ट्रॉफी वनडे स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य लढतीत भारताविरुद्ध मैदानात उतरणार आहे. मात्र, गतविजेत्या भारताला नमविणे सोपे नसेल. अनुभव, सूर अन् मोठ्या स्पर्धांमध्ये कसलेल्या दुष्मनांशी खेळायची सवय यामुळे भारताचेच पारडे जड आहे. भारतीय संघ सलग दुसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल होण्यासाठी उत्सुक आहे.

पाकिस्तानला नमविल्यानंतर भारताला श्रीलंकेकडून पराभव पत्करावा लागला होता. यानंतर भानावर अन् किंबहुना जमीनीवर आलेल्या भारताने वनडे रँकिंगमध्ये अव्वल असलेल्या दक्षिण आफ्रिकेला सहज पराभूत करून उपांत्य फेरी गाठली आहे. त्यामुळे भारतीय खेळाडूंचा आत्मविश्वास उंचावला आहे. कागदावर भारतीय संघ बांगलादेशच्या तुलनेत कितीतरी पुढे आहे. पण न्यूझीलंडविरुद्ध विजयाने बांगलादेशनेही आम्हाला कमी लेखू नका, असा सावधानतेचा इशारा दिला आहे. या स्पर्धेत बांगलादेशला नशिबाची साथ मिळाली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध बांगलादेशचा डाव १८२ धावांत आटोपला होता. पण पावसामुळे ही लढत रद्द झाली आणि बांगलादेशला एक गुण मिळाला. यानंतर न्यूझीलंडवर विजय मिळवूनही त्यांचा उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित नव्हता; पण इंग्लंडने ऑस्ट्रेलियाला नमविले आणि बांगलादेशचा उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित झाला. या लढतीत बांगलादेशवर कुठलेही दडपण नसेल, एवढे मात्र निश्चित. भारताला मात्र बांगलादेशविरुद्ध सरस खेळ करावा लागेल. अन्यथा, कोहली आणि प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्या वादामुळे भारताच्या पदरी पराभव पडला, अशी टीका निश्चित होईल.

या स्पर्धेपूर्वीच्या सराव सामन्यात भारत-बांगलादेश लढत झाली होती. यात भारताने ३२४ धावांपर्यंत मजल मारली होती. त्यानंतर भुवनेश्वरकुमार आणि उमेश यादवने अचूक मारा करून बांगलादेशला २३.५ षटकांत ८४ धावांत गुंडाळले होते. भारताने ही लढत २४० धावांनी जिंकली होती. त्यामुळे रवीचंद्रन अश्विनच्या जागी पुन्हा उमेश यादवला स्थान द्यायचे की नाही, हा प्रश्न कोहलीसमोर असणार आहे. भारताला फलंदाजीची चिंता नाही. रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली, युवराजसिंग, धोनी, केदार जाधव, हार्दिक पंड्या, रवींद्र जाडेजा अशी खोलवर फलंदाजी आहे. गोलंदाजांनीही पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आपली छाप पाडली आहे. दुसरीकडे, बांगलादेशची भिस्त मश्रफी मोर्तझा, शकीब अल हसन, मुशफीक्यूर रहीम, तमिम इक्बाल, महमुदुल्लाह यांच्यावर आहे. भारताला पराभूत करून इतिहास रचण्यासाठी बांगलादेश संघ उत्सुक आहे.


बांगलादेश इतिहास रचण्यास उत्सुक

२०१५मध्ये मायदेशात झालेल्या वनडे मालिकेत बांगलादेशने भारताला २-१ असे नमविले आहे. त्याचबरोबर २००७च्या वन-डे वर्ल्ड कपमध्ये बांगलादेशने भारताला पराभूत केले होते. गेल्या वर्षी झालेल्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये बांगलादेशने भारताला विजयासाठी चांगले झुंजविले होते. भारताने पराभव टाळून ही लढत एका धावेने जिंकली होती. तेव्हा पुन्हा एकदा भारतावर सनसनाटी विजय मिळवून अंतिम फेरीत दाखल होऊन इतिहास रचण्यास बांगलादेश संघ सज्ज आहे.

दबाव भारतावर : अश्रफुल

कोलकाता : चॅम्पियन्स ट्रॉफीत भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध फेव्हरिट असला, तरी गतविजेत्या भारतावरच अधिक दबाव असणार आहे, असे मत बांगलादेशचे माजी कर्णधार महम्मद अश्रफुल याने व्यक्त केले. अश्रफुल म्हणाला, ‘यापूर्वी आम्ही आशिया कपच्या अंतिम फेरीत पोहोचलो आहोत. अर्थात चॅम्पियन्स ट्रॉफी ही मोठी स्पर्धा आहे. मिनी वर्ल्ड कप म्हणून या स्पर्धेकडे बघितले जाते. गतविजेते असल्याने भारतावर अधिक दबाव असणार आहे. आमचा संघही अनुभवी आहे. सांघिक कामगिरी केली, तर बांगलादेश इतिहास रचू शकतो.’


आयसीसी रँकिंग

३ भारत

६ बांगलादेश

आमनेसामने

३२ वनडे

२६ विजय भारताचे

५ विजय बांगलादेशचे

१ अनिर्णित

साखळीतील कामगिरी

भारत

पाकिस्तानवर १२४ धावांनी मात

श्रीलंकेकडून ७ विकेटनी पराभूत


दक्षिण आफ्रिकेवर ८ विकेटनी मात

बांगलादेश

इंग्लंडकडून ८ विकेटनी पराभूत

ऑस्ट्रेलियाविरुद्धची लढत रद्द

न्यूझीलंडवर ५ विकेटनी मात

सामन्याची वेळ: दुपारी ३ पासून.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *