पंढरपूर दि. 23 :- आषाढी यात्रा सोहळ्यासाठी राज्यातून तसेच परराज्यातून विठ्ठलाच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. येणा-या भाविकांच्या सुरक्षेची पोलीस प्रशासनाकडून सर्वोपतरी काळजी घेण्यात येणार असल्याची माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरिक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी दिली.
पंढरपूर आषाढी यात्रेत सुरक्षेच्या तयारी बाबत शासकीय विश्रामगृह पंढरपूर येथे झालेल्या पोलिस प्रशासनाच्या बैठकीत ते बोलत होते यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक एस.विरेश प्रभू, अप्पर पोलीस अधिक्षक मिलींद मोहिते, सहाय्यक पोलिस अधिक्षक निखिल पिंगळे, तालुका पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे, शहर पोलीस निरक्षक विठ्ठल दबडे यांच्यासह पोलीस विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना पोलिस महानिरिक्षक नांगरे-पाटील म्हणाले, वारी कालावधीत वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्यासाठी आणि वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत. वारीमध्ये मोठ्या संख्येने येणा-या वाहनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी नाकाबंदी व वाहन तपासणी करण्यात येणार आहे. या करीता वाहतूक शाखेतील अधिकारी आणि कर्मचा-यांची संख्या वाढविण्यात आली आहे. वारीत होणा-या चोरीच्या घटनावर नियंत्रण राखण्यासाठी परिक्षेत्राच्या प्रत्येक जिल्हातील पोलीसांचे पथक कार्यरत असणार आहे. तसेच वाहतूकीला अडथळा करणारे हॉकर्स आणि मोकाट जनावरांचा बंदोबस्त नगर पालिकेच्या सहकार्याने करावा अशा सुचना त्यांनी यावेळी दिल्या.
वारी कालावधीत घातपाताच्या घटना रोखण्यासाठी बॉम्ब शोधक पथक, श्वान पथक तसेच पोलीसांचे विशेष पथक नेमण्यात आले आहे.याबरोबर महिलांच्या सुरक्षेसाठी महिलांचे विशेष पथक, गर्दीवर नियंत्रण राखण्यासाठी सी.सी.टीव्ही व आवश्यक ठिकाणी प्रखर प्रकाशाची सोय केली जाणार आहे. तसेच गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सुरक्षतेचे शहरात तीन झोन तयार करण्यात येणार असल्याचे पोलिस महानिरिक्षक नांगरे-पाटील यांनी सांगितले.
यात्रा कालावधीत भाविकांच्या सुरक्षेसाठी एक पोलीस अधिक्षक, सात अप्पर पोलीस अधिक्षक, 14 पोलीस उपअधिक्षक, 59 पोलीस निरिक्षक, 203 पोलीस उपनिरिक्षक, 27 महिला पोलीस उपनिरिक्षक, 3 हजार 215 पोलीस कर्मचारी, 555 महिला पोलीस कर्मचारी, राखीव पोलीस दलाचे 50 कर्मचारी तसेच वाहतूक शाखेसाठी 3 पोलीस उप-अधिक्षक, 10 पोलीस निरीक्षक, 25 पोलीस उप-निरिक्षक, 420 पोलीस कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. याचबरोबर एसआरपीएफ च्या 3 तुकड्या तैनात करण्यात येणार आहेत. तसेच 1 हजार 400 पुरुष होमगार्ड तर 200 महिला होम गार्ड नेमण्यात येणार आहेत. वारी कालावधीत नेमलेल्या पोलीस कर्मचारी व अधिकारी यांच्या निवासाची सोय तसेच आरोग्याची काळजी घेतली जाणार असल्याचेही पोलिस महानिरिक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी यावेळी सांगितले.
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111



