👁 13 Views

वारी- आषाढ मास विशेष लेख :संत एकनाथ महाराज

संत एकनाथ(१५३३-१५९९) हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील एक सुप्रसिद्ध संत होते. त्यांचा जन्म इ.स. १५३३ मध्ये पैठण येथे झाला.

शांतिब्रह्म, ‘संत’पदाला पोहोचलेले सत्पुरुष, उच्च कोटीचे समाजसुधारक, महान तत्त्ववेत्ता, संस्कृत भाषेचे गाढे अभ्यासक अशा अनेक गुणविशेषणांसह ’ज्ञानाचा एका’ या बिरुदावलीने साऱ्या महाराष्ट्राला परिचित असणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे संत एकनाथ. आदर्श गृहस्थाश्रमी, मायमराठीचे सुपुत्र, व्युत्पन्नमति पंडित, दयेचा सागर या शब्दांतही त्यांचे वर्णन करता येईल.

एकनाथांनी देवगिरी (दौलताबाद) च्या जनार्दनस्वामींना त्यांनी गुरू मानले. त्यांच्याकडूनच एकनाथांनी वेदान्त, योग, भक्तियोग यांचे शिक्षण घेतले. बराचसा काळ ध्यान आणि वेदाध्ययनात घालवला. गुरूंबरोबर तीर्थयात्रा केल्यानंतर त्यांनी गृहस्थाश्रम स्वीकारला. गिरिजाबाई हे त्यांच्या पत्नीचे नाव.

एकनाथांचे मूळ पुरुष भास्करपंत कुलकर्णी, हे प्रतिष्ठान ऊर्फ पैठण नगरीत राहणारे होते. संत भानुदास हे एकनाथांचे पणजोबा. ते सूर्याची उपासना करीत. श्री संत एकनाथांच्या वडिलांचे नाव सूर्यनारायण होते. आईचे नाव रुक्मिणी होते. एकनाथांचा जन्म शके १४५० ते १४५५ या दरम्यान झाल्याचे मानले जाते. दुर्दैवाने त्यांना आई-वडिलांचा सहवास फार काळ लाभला नाही. त्यांचे पालनपोषण आजोबांनी केले. चक्रपाणी आणि सरस्वती हे त्यांचे आजोबा व आजी होत. एकनाथांना लहानपणापासून अध्यात्मज्ञानाची व हरिकीर्तनाची आवड होती. एकनाथांचे गुरू सद्गुरू जनार्दनस्वामी हे देवगड (देवगिरी) येथे यवन दरबारी अधिपती होते. हे मूळचे चाळीसगावचे रहिवासी; त्यांचे आडनाव देशपांडे होते. ते महान दत्तोपासक होते. सद्गुरू म्हणून संत एकनाथांनी त्यांना मनोमन वरले होते. जनार्दनपंत हे विद्वान व सत्शील आचरणाचे होते. नाथांनी अथक परिश्रम करून गुरुसेवा केली आणि साक्षात दत्तात्रेयांनी त्यांना दर्शन दिले, असे म्हणतात. आत्मबोध, पूर्णगुरुकृपा, आणि भगवंत दत्तात्रेय यांचे दर्शन यांमुळे नाथांचे जीवन धन्य झाले. नाथांनी अनेक तीर्थयात्राही केल्या. नाथांनी एका सद्गुणी व सुलक्षणी मुलीशी विवाह केला. ही मुलगी पैठणजवळच्या वैजापूरची होती. एकनाथ आणि गिरिजाबाई यांना गोदावरी व गंगा या दोन मुली व हरी नावाचा मुलगा झाला. त्यांचा हा मुलगा हरिपंडित या नावाने प्रख्यात झाला. तो परंपरेचा अतिशय अभिमानी होता. त्याने नाथांचे शिष्यत्व पत्करले. एकनाथांनी समाधी घेतल्यानंतर हरिपंडितांनी नाथाच्या पादुका दरवर्षी आषाढीवारीसाठी पंढरपुरास नेण्यास सुरुवात केली.

कवी मुक्तेश्वर हे नाथांचे मुलीकडून नातू होत.

संत ज्ञानेश्वरांच्या नंतर सुमारे २५० वर्षांनी नाथांचा जन्म झाला. अतिशय प्रतिकूल परिस्थिती होती. यवनांचे राज्य होते. याच दरम्यान विजयनगरचे हिंदू साम्राज्य बुडाले होते. संपूर्ण समाज कर्तव्यच्युत झालेला होता. स्वधर्म, स्वराष्ट्र, स्वराज्य यांविषयी सर्वत्र अज्ञानाचे वातावरण होते. कर्मकांड, कर्मठपणा यावर जास्त भर होता. भर दिवसा स्त्रिया बाटविल्या जात होत्या. धर्मावर अत्याचार होत होता. अशा बिकट समयी नाथांनी समाज सुधारण्यासाठी जगदंबेला साद घातली. ‘बये दार उघड’ असे म्हणत नाथांनी भारूड, जोगवा, गवळणी, गोंधळ यांच्या साहाय्याने जनजागृती केली. संत एकनाथ हे संतकवी, पंतकवी व तंतकवी होते. रंजन व प्रबोधन करत अध:पतित समाजाला त्यांनी सन्मार्गावर आणले, महाराष्ट्राचा पुरुषार्थ जागविला. ते ’एका जनार्दन’ म्हणून स्वतःचा उल्लेख करतात, एका जनार्दनी ही त्यांची नाममुद्रा आहे. अनेक रचना, अभंग, गवळणी असे स्फुट लेखन त्यांनी केले. ’एकनाथी भागवत’ हा त्यांचा ग्रंथ लोकप्रिय आहे. ही एकादश स्कंदावरील टीका आहे. मुळात एकूण १३६७ श्र्लोक आहेत. परंतु त्यावर भाष्य म्हणून १८,८१० ओव्या संत एकनाथांनी लिहिल्या आहेत. मूळ भागवत १२ स्कंदांचे आहे. हे (व्यासकृत) काव्य अतिशय प्रासादिक आहे. नाथांनी लिहिलेल्या भावार्थ रामायणाच्या सुमारे ४० हजार ओव्या आहेत. त्यांचे रुक्मिणीस्वयंवर अत्यंत लोकप्रिय होते. नाथांची दत्ताची आरतीही (त्रिगुणात्मक त्रयमूर्ति दत्त हा जाण) प्रसिद्ध आहे. या महात्म्याने विपुल वाङ्मय निर्माण करून मराठी भाषा समृद्ध केली. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ज्ञानेश्वरीची प्रत शुद्ध केली. नाथ हे महावैष्णव होते. दत्तभक्त होते, देवीभक्त पण होते. जातिभेद दूर करण्यासाठी यांनी आयुष्यभर प्रयत्न केले.

फाल्गुन वद्य षष्ठी, शके १५२१ (२५ फेब्रुवारी इ.स. १५९९) या दिवशी संत एकनाथांनी देह ठेवला. फाल्गुन वद्य ष्ष्ठी हा दिवस एकनाथ षष्ठी म्हणून ओळखला जातो.

एकनाथांची गुरुपरंपरा :

नारायण (विष्णू)
ब्रह्मदेव
अत्री ऋषी
दत्तात्रेय
जनार्दनस्वामी
एकनाथ

कार्य व लेखन


एकनाथी भागवत: भागवत पुराणातील अकराव्या स्कंधावर ओवीबद्ध मराठी टीका
चतु:श्लोकी भागवत
एकनाथी अभंग गाथा
संत एकनाथमहाराज कृत हरिपाठ – एकूण २५ अभंग
हस्तमालक टीका
शुकाष्टक टीका
स्वात्मबोध
चिरंजीवपद
आनंदलहरी
अनुभवानंद
मुद्राविलास
लघुगीता
समाजाच्या जागृतीसाठी अभंग, गवळणी व भारुडे यांची रचना.
ज्ञानेश्वरीच्या उपलब्ध प्रतींचे शुद्धीकरण (ज्ञानेश्वरी लिहिल्यानंतर जवळजवळ २५० वर्षांनंतर) ज्ञानेश्वरी च्या शुद्धीकरणाचे काम त्यांनी शके १५०६ मध्ये पूर्ण केले.
रुक्मिणीस्वयंवर
भावार्थ रामायण (४० हजार ओव्या)हिंदीसह अनेक भाषांत भाषांतरे)
संत ज्ञानेश्वरांचे आळंदी येथील समाधिस्थळाचा शोध

श्रीविठ्ठलमाहात्म्य


८. अनादि परब्रह्मा जे का निजधाम | तें हि मूर्ति मेघःश्याम विटेवरी |१|| जें दुर्लभ तिहीं लोकां न कळे ब्रह्मादिकां | तपे पुंडलिका जोडलेंसे ||२|| जयातें पहातां श्रुती परतल्या नेति नेति | ती हे परब्रह्मा मूर्तिं विटेवरी ||३|| वेदां मौन्य पडे श्रुतीसी सांकडे | वर्णितां कुवाडें पुराणांसी ||४|| ज्ञानियाचें ज्ञान मुनीजनांचे ध्यान | ते परब्रह्मा निधान विटेवरी ||५|| पुंडलिकाचे तपें जोडलासें ठेवा | भानुदास देवा सेवा मागे ||६|| ९. अद्वय आनंद तो हा परमानंद | शोभे सच्चिदानंद विटेवरी ||१|| सांवळे रूपडें गुणा अगोचर | उभा कटीं कर ठेऊनि विटे ||२|| पीतांबर परिधान चंदनाची उटी | रुळे माळ कंठीं वैजयंती ||३|| भानुदास म्हणे ब्रह्मा अगोचर | नेणवे विचार ब्रह्मादिकां ||४|| १०. वेदीं सांगितलें श्रुतीं अनुवादलें | तें ब्रह्मा कोंदलें पंढरीये ||१|| वाळूवंटी वुंथी श्रीविठ्ठलनामें | सनकादिक प्रेमें गाती जया ||२|| भानुदास म्हणे तो हरि देखिला | हृदयीं सांठविला आनंदभरित ||३|| ११. चंद्रभागेतीरीं उभा विटेवरी | विठ्ठल राज्य करी पंढरीये ||१|| ऋद्धिसिद्धि धृती वोळंगती परिवार | न साहाती अवसर ब्रह्मादिकां ||२|| सांडोनि तितुलें याथाबिजें केलें | कवणें चाळविलें कानडीयासी ||३|| उष्णोदक मार्जन सुगंधचर्चन | भीवरा चंदन पाट वाहे ||४|| रंभा तिलोत्तमा उर्वशी मेनिका | कामारी आणिका येती सवें ||५|| कनकाचे परयेळी रत्नाचे दीपक | सुंदर श्रीमुख ओवाळिती ||६|| संत भागवत सकल पारुषले | निःशब्द होऊनि ठेले तुजविण ||७|| रुक्माबाई ती जाहलीसे उदास | पुंडलिका कैसें पडले मौन ||८|| येसी तरी येई पंढरीच्या राया | अगा कृपावर्या पांडुरंगा ||९|| धन्य पंढरपूर विश्रांति माहेर | धन्य भीमातीर वाळुवंट ||१०|| भानुदास म्हणे चला आम्हांसवे | वाचा ऋण देव आठवावें ||११|| १२. जैसा उपनिषदांचा गाभा | तैसा विटेवरी उभा | अंगीचिया दिव्य प्रभा | धवळिलें विश्व ||१|| उगवती या सुरज्या | नवरत्नें बांधू पूजा | मुगुटीं भाव पैं दुजा | उपमा नाहीं ||२|| दोन्हीं कर कटीं | पीतांबर माळ गांठी | माळ वैजयंती कंठी | कौस्तुभ झळके ||३|| कल्पद्रुम छत्राकार | तळीं त्रिभंगीं बिढार | मुरली वाजवी मधुर | श्रुती अनुरागें ||४|| वेणुचेनि गोडपणें | पवन पांगुळलां तेणे | तोही निवे एक गुणें | अमृतधारीं ||५|| अहो लेणियाचें लेणें | नाद्सुखासी पैं उणें | विश्व बोधिलें येणें | गोपाळवेषें ||६|| पुंडलिकाचेनि भावें | श्रीविठ्ठल येणें नावें | भानुदास म्हणे दैवें | जोडलें आम्हा ||७|| १३. शंख चक्र गदाधरू | कासे सुरंग पीतांबरू | चरणीं ब्रीदाचा तोडरू | असुरावरी काढितसे ||१|| बरवा बरवा केशिराजु | गरुडवहन चतुर्भुजु | कंठीं कौस्तुभ झळके बिजु | मेघःश्याम देखोनी ||२|| करी सृष्टीची रचना | नाभीं जन्म चतुरानना | जग हें वाखाणी मदना | तें लेकरूं तयाचें ||३|| कमळा विलासली पायीं | आर्त तुळशीचे ठायीं | ब्रह्मादिकां अवसरु नाहीं | तो यशोदे वोसंगा ||४|| उपमा द्यावी कवणे अंगा | चरणीं जन्मली पैं गंगा | सोळा सहस्त्र संभोग | नित्य न पुरती कामिनी ||५|| अधिष्ठान गोदातीरीं | ऋद्धिसिद्धि तिष्ठती द्वारीं | भानुदास पूजा करी | वाक्पुष्पें अनुपम्य ||६|| १४. लावण्य रूपडें पहा डोळेभरी | मूर्ति हे गोजिरी विटेवरी ||१|| राही रखुमाई सत्यभामा आई | गरुड हनुमंत ठायीं उभे असती ||२|| चंद्रभागा तीर्थ पुंडलीक मुनी | दक्षिणवाहिनी शोभतसे ||३|| वेणुनादीं काला गोपाळ करिती | भानुदास तृप्ति पाहूनिया ||४|| १५. देखतांचि रूप विटेवरी गोजिरें | पाहतां साजिरें चरणकमळ ||१|| पाहतां पाहतां दृष्टी धाये जेणें | वैकुंठीचें पेणें सहज हातीं ||२|| भानुदास म्हणे लावण्य पुतळा | देखियेला डोळा पांडुरंग ||३|| १६. चतुर्भुज मूर्ति लावण्य रुपडें | पाहतां आवडे जीवा बहु ||१|| वैजयंती माळा किरीट कुंडले | भूषण मिरवलें मकराकार ||२|| कासे सोनसळा पितांबर पिवळा | कस्तुरीचा टिळा शोभे माथे ||३|| शंक चक्र हातीं पद्म तें शोभलें | भानुदासें वंदिलें चरणकमळ ||४|| १७. गोंड साजिरें रूपस | उभा आहे हृषीकेश | योगी ध्याती जयास | तो हा सर्वेश साजिरा ||१|| रूप मंडित सगुण | शंख चक्र पद्म जाण | गळां वैजयंती भूषण | पीतांबर मेखळा ||२|| कस्तुरी चंदनाचा टिळा | मस्तकीं मुकुट रेखिला | घवघवीत वनसांवळा | नंदरायाचा नंदनु ||३|| हरुषे भानुदास नाचे | नाम गातसे सदा वाचे | प्रेम विठोबाचें | अंगी वसे सर्वदा ||४|| १८. उन्मनीं समाधीं नाठवे मानसी | पहातां विठोबासीं सुख बहु ||१|| आनंदाआनंद अवघा परमानंद | आनंदाचा कंद विठोबा दिसे ||२|| जागृती स्वप्न सुषुप्ती नाठवे | पाहतां सातवे रूप मनीं ||३|| नित्यता दिवाळी नित्यता दसरा | पाहतां साजिरा विठ्ठलदेव ||४|| भानुदास म्हणे विश्रांतीचें स्थान | विठ्ठल निधान सांपडले ||५|| १९. जन्मोजन्मीं आम्ही बहु पुण्य केलें | म्हणोनि विठ्ठलें कृपा केली ||१|| जन्मोनी संसारीं जाहलों त्याचा दास | माझा तो विश्वास पांडुरंगीं ||२|| आणिका दैवता नेघे माझे चित्त | गोड गाता गीत विठोबाचें ||३|| भ्रमर मकरंदा मधाशी ती माशी | तैसें या देवासी मन माझे ||४|| भानुदास म्हणे मज पंढरीसी न्या रे | सुखें मिरवा रे विठोबासी ||५|| २०. आलो दृढ धरुनी जीवीं | तो गोसावी भेटला ||१|| जन्ममरण हरला पांग | तुटला लाग प्रपंचा ||२|| इच्छा केली ती पावलों | धन्य जाहलों कृतकृत्य ||३|| भानुदास म्हणे देवा | घ्यावी सेवा जन्मोजन्मीं ||४|| २१. वेदशास्त्रांचें सार | तो हा विठ्ठल विटेवर ||१|| पुढें शोभे चंद्रभागा | स्नाने उद्धार या जगा ||२|| पद्मतळें गोपाळपूर | भक्त आणि हरिहर ||३|| भानुदास जोडोनी हात | उभा समोर तिष्ठत ||४||


  



















सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 

पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *