आगामी विश्वचशकापर्यंत शास्त्री संघाचे प्रशिक्षक राहणार
भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षपदी अखेर रवी शास्त्री यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. काल मुंबईत पार पडलेल्या मुलाखतीनंतर आज क्रिकेट सल्लागार समितीने याविषयीची घोषणा केली आहे. रवी शास्त्री यांनी काल स्काईपद्वारे सल्लागार समितीला मुलाखत दिली होती. एएनआय या वृत्तसंस्थेने या विषयीची माहिती दिली आहे. भारताचा आगामी श्रीलंका दौरा रवी शास्त्रींसाठी महत्वाचा ठरणार आहे. खासकरुन विराट कोहली आणि संघातील काही खेळाडूंनी शास्त्रींच्या नावाला आपली पसंती दिल्यामुळे भारतीय संघाच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.
अनिल कुंबळे प्रशिक्षक म्हणून येण्याआधी रवी शास्त्री यांनी संघाच्या मुख्य व्यवस्थापकाची भूमिका पार पाडली होती. या कालावधीत शास्त्री यांची कामगिरी ही चांगली होती. मात्र प्रशिक्षकपदाच्या मुलाखतीत सौरव गांगुली आणि रवी शास्त्री यांच्यात वाद झाल्यामुळे अनिल कुंबळेंची एक वर्षासाठी निवड करण्यात आली होती. सुरुवातीचा काही काळ चांगला गेल्यानंतर अचानक कोहली आणि कुंबळे यांच्यात बेबनावाच्या बातम्या समोर आल्या. त्यातचं चॅम्पियन्स करंडकात कोहली आणि कुंबळे यांच्यातले संबध ताणले गेल्याचं समोर आलं होतं. कुंबळे यांच्या प्रशिक्षणाची शैली खेळाडूंना पसंत नसल्याचं कारण देत कोहलीने रवी शास्त्री यांच्या नावाला आपली पसंती दिली होती. यासाठी त्याने लंडनमध्ये चॅम्पियन्स करंडकादरम्यान क्रिकेट सल्लागार समितीच्या सदस्यांची भेटही घेतली होती. त्यामुळे अनिल कुंबळेंच्या राजीनाम्यानंतर रवी शास्त्री यांची निवड होणार हे नक्की मानलं जातं होतं.
२०१९ च्या विश्वचषकापर्यंत रवी शास्त्री संघाचे प्रशिक्षक राहणार आहेत. त्याआधी रवी शास्त्रींसमोर श्रीलंका दौऱ्याचं मोठं आव्हान असणार आहे. गेल्या एक वर्षात भारतीय संघ मायदेशात कसोटी सामने खेळला होता. त्यात त्यांची कामगिरी चांगली राहिली होती. मात्र श्रीलंका दौऱ्यात भारतीय संघााला ३ कसोटी, वन-डे आणि टी-२० सामने खेळायचे आहेत. त्यामुळे या पहिल्या परिक्षेत विराट कोहलीची टीम इंडिया रवी शास्त्रींच्या सोबतीने कशी कामगिरी करते हे पहावं लागेल.
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111










