सोलापूर दि. 15: लॉकडाऊनच्या कालावधीत सोलापूर जिल्ह्यात अन्नधान्याचा पुरवठा नियमित व्हावा यासाठी जिल्हा प्रशासनाने आराखडा तयार केला आहे. त्यानुसार 30 एप्रिल पर्यंत जून महिन्यापर्यंतचे धान्य वितरण केले जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.
त्यांनी दिलेल्या माहितीनुसार हे अन्नधान्य अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना वितरण केले जाणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील प्राधान्य कुटुंब योजनेतून तेवीस लाख सोळा हजार तेहत्तीस लाभार्थ्यांना लाभ मिळेल तर अंत्योदय योजनेतून दोन लाख त्र्याहत्तर हजार नऊशे बारा लाभार्थ्यांना लाभ मिळेल.
जिल्हा पुरवठा कार्यालयाकडून एप्रिल महिन्यातील 96 टक्के धान्याचे वितरण झाले आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेतून दिले जाणारे प्रति व्यक्ती 5 किलो तांदळाचे 32 टक्के वाटप झाले आहे. येत्या 17 एप्रिल पर्यंत उर्वरित वाटप पूर्ण करणार आहे. मे महिन्याचे नियमित वाटप 17 ते 20 एप्रिल 2020 पर्यंत पूर्ण केले जाईल. मे महिनयासाठीचा मोफत तांदूळाचे वितरण 21 ते 23 एप्रिलपर्यंत केले जाईल. जूनचे नियमित वितरण 24 ते 26 एप्रिल पर्यंत केले जाईल. मात्र हे धान्य अंत्योदय आणि कुटुंब प्राधान्य योजनेत नियमित धान्य घेणा-या लाभार्थ्यांना मिळणार आहे. केशरी कार्ड धारकांना मे आणि जून महिन्यासाठी 1 मे नंतर धान्य वितरण केले जाईल, अशी माहिती शंभरकर यांनी दिली.

