पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन-
बेळगाव – अखेर कर्नाटक सरकारने बेळगावातील रातोरात हटवलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा येत्या आठ दिवसात पुन्हा बसवण्याचे आश्वासन दिले आहे.
कर्नाटक सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्याच्या संतापजनक प्रकारानंतर मनगुत्तीपासून संपूर्ण महाराष्ट्रात याचे पडसाद दिसून आले. परिस्थिती पाहता कर्नाटक सरकारने सावध भूमिका घेत हा निर्णय घेतल्याचं चित्र आहे.
कर्नाटक प्रशासनाकडून आठ दिवसात परवानगी देऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्यात आला होता. मात्र, पुतळा हटवण्यासाठी पोलिसांनी दबाव आणला होता. मनगुत्ती येथील नागरिक यासाठी रस्त्यावर उतरले होते. तेव्हा कुठे पोलिसांचा दबाव कमी झाला आणि शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आला. मात्र, आता हाच पुतळा कर्नाटक सरकारनं हटवला आहे.
सरकारच्या आदेशानंतर रातोरात पोलीस बंदोबस्तात शिवरायांचा पुतळा हटवण्यात आला आहे. या घटनेनंतर महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील शिवभक्तांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे कर्नाटक सरकारला वावडे का?, असा सवाल आता उपस्थित करण्यात येत आहे.

