निलेश चाळक बीड : प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाची काटेकोर अंमलबजावणी करा. फसवे आकडे देऊन सारे काही अलबेल आहे असे दाखवू नका. गुणवत्ता नसल्यानेच ऊसतोड मजुरांच्या पाल्यांचे स्थलांतर होते अशा शब्दांत राज्याचे शिक्षण सचिव नंदकुमार यांनी रविवारी खडेबोल सुनावले. शिक्षणाचा दर्जा वाढवा अन् एकही विद्यार्थी स्थलांतर होणार नाही याची दक्षता घ्या असे निर्देशही त्यांनी दिले.

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र, हंगामी वसतिगृहांचा आढावा घेण्यासाठी शनिवारी शिक्षण सचिव नंदकुमार बीडमुक्कामी होते. रविवारी सकाळी त्यांनी बीड तालुक्यातील नवगण राजुरी जि.प. शाळेत भेट दिली. त्यानंतर जिल्हा नियोजन समिती सभागृहात बैठक घेतली. यावेळी राज्य प्राथमिक शिक्षण परिषदेचे सल्लागार सिद्धेश वाडकर, विद्या प्र्राधिकरणच्या उपसंचालक शोभा खंदारे, कार्यकारी सहायक शाम मकररासपुरे, शिक्षण व प्रशिक्षण संस्था औरंगाबादचे प्राचार्य डॉ. सुभाष कांबळे, बीडचे प्राचार्य डॉ. गजानन देवगावकर, सीईओ धनराज नीला, शिक्षणाधिकारी (प्रा.) भावना रजनोर, शिक्षणाधिकारी (मा.) भगवान सोनवणे यांची उपस्थिती होती.
रविवारी सकाळी ९ वाजता सचिव नंदकुमार यांनी ‘तुमच्या भागातील सर्वांत उत्कृष्ठ जि.प. शाळेत कोणती?’ असा प्रश्न विचारला. त्यानंतर लवाजमा नवगण राजुरी जि.प. शाळेत पोहोचला. सुटी असतानाही विद्यार्थ्यांना पाचारण केले होते. विशेष म्हणजे दफ्तराशिवाय विद्यार्थ्यांना शाळेत बोलावले होते. तेथे मुख्याध्यापक विनायक सालगुडे व शिक्षकांशी नंदकुमार यांनी संवाद साधला. त्यानंतर परिपाठ घेतला. सोबतच इंग्रजीतून संविधान वाचन झाले.
सकाळी ११ वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृहात नंदकुमार यांनी बैठक घेतली. यावेळी संगणकीकृत सादरीकरणाद्वारे त्यांनी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र व हंगामी वसतिगृहांची माहिती जाणून घेतली. यावेळी गुणवत्तापूर्ण अध्यापनासंबंधी संगणकीकृत सादरीकरण करणाऱ्या १० शिक्षकांशी त्यांनी संवाद साधला.
जिल्ह्यात ६७३ वसतिगृहांना प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली असून ४२ हजारावर विद्यार्थ्यांचे स्थलांतर रोखण्याचे नियोजन आहे. मात्र, आतापर्यंत केवळ ४१० वसतिगृहे सुरु झाली असून त्यात २५ हजार विद्यार्थ्यांची सोय करण्यात आली आहे. दरम्यान, हिंगोली व जालना येथे शासननिधी न घेता पालकांमध्ये जनजागृती करुन हंगामी वसतिगृहांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे स्थलांतर रोखण्यात आले आहे. त्या धर्तीवर बीडमध्येही पुढील वर्षी चळवळ राबवून शासननिधी न घेता गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या जोरावर विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात टिकवून ठेवा असे आवाहन नंदकुमार यांनी केले. यावेळी उपशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक उपस्थित होते.
सचिव वर्ग घेतात तेव्हा..!
नवगण राजुरी शाळेत भेट दिल्यानंतर तेथील भौतिक सुविधा पाहून सचिव नंदकुमार यांनी समाधान व्यक्त केले. मात्र, गुणवत्तेची स्थिती पडताळून पाहण्यासाठी परिपाठानंतर त्यांनी चौथी इयत्तेच्या विद्यार्थ्यांचा वर्ग घेतला. आतमध्ये केवळ औरंगाबाद शिक्षण व प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य डॉ. सुभाष कांबळे व शिक्षणाधिकारी (प्रा.) भावना रजनोर यांना प्रवेश दिला. यावेळी ५५ विद्यार्थी वर्गात होते. नंदकुमार यांनी गणिताचे प्रश्न विचारले, त्यावर 20 विद्यार्थ्यांनी अचूक उत्तरे दिली. एका विद्यार्थिनीचा भागाकार चुकला होता. तेव्हा कुठे गफलत झाली हेही तिला सचिवांनी समजावून सांगितले. ५२५ गुणिले ५ हा प्रश्नही त्यांनी विचारला. विद्यार्थी दफ्तराशिवाय असल्याने तोंडी उत्तरे द्यावयाची होती. यावेळी त्यांनी भागाकाराचे प्रश्नही विचारले.
बायोमेट्रिक हजेरी आता आॅनलाईन
हंगामी वसतिगृहांमधील विद्यार्थ्यांच्या नोंदी घेण्यासाठी बायोमेट्रिक प्रणाली आणली आहे; परंतु मागील दोन वर्षांत त्याची काटेकोर अंमलबजावणी झाली नाही. यावेळी मात्र, शिक्षण विभाग लवकरच एक अॅप कार्यान्वित करणार आहे. त्यावर बायोमेट्रिकमध्ये नोंद होणाºया उपस्थितीचे आॅनलाईन संनियंत्रण करण्यात येणार आहे. एकही विद्यार्थी स्थलांतरित होता कामा नये. जे विद्यार्थी स्थलांतरित झाले, त्यांना परत आणा. याउपरही ते परत आणता आले नाही तर त्यांना शिक्षण हमी कार्ड देऊन स्थलांतरित ठिकाणी शिक्षणाची सोय करा अशा सूचना नंदकुमार यांनी दिल्या. विद्यार्र्थ्यांच्या गुणवत्तेशी खेळू नका, राज्य प्रशिक्षणाला चांगले शिक्षक पाठवा व वसतिगृहांमधून अद्ययावत सुविधा पुरवा असे निर्देश देखील त्यांनी दिले.
14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर






