पंढरपूर Live 8 December 2017
निलेश चाळक बीड : खेळण्या- बागडण्याच्या वयात तिच्या डोक्यावरुन आई- वडिलांचे छत्र नियतीने हिरावून घेतले. जवळच्या नातेवाईकांनीही झिडकारले. आधार उरला आत्याचा; पण तिच्याकडेही ती असुरक्षित होती. दोन वर्षांपूर्वी आश्रय अल्पमुदती निवासगृहात तिला ‘आश्रय’ मिळाला; पण आयुष्यात एकापाठोपाठ आलेल्या वादळांनी ती उमेद गमावून बसली होती. मात्र, तिला आयुष्याचा जोडीदार मिळाला असून येत्या १२ डिसेंबरला लग्नाचा बार मोठ्या दिमाखात उडणार आहे.
आकांक्षा तिचं नाव. दगडाला पाझर फु टावा अशी तिची आपबिती. आई- वडील गेल्यावर आत्याकडे काही वर्षे तिने काढले; परंतु दिवस सरस होते तशी ती मोठी होत होती. जेमतेम शिक्षण अन् पुढ्यात वाढून ठेवलेल्या दु:खामुळे ती पुरती खचून गेली होती. अशावेळी ग्रामीण विकास मंडळ, बनसारोळा या संस्थेच्या आश्रय अल्पमुदती निवासगृहाचा तिला मोठा आधार मिळाला. दोन वर्षांपूर्वी निवासगृहात आलेल्या आकांक्षा इतर मैत्रिणींमुळे कशीबशी सावरली. वयाची १८ वर्षे ओलांडल्यामुळे निराश्रीत असलेल्या आकांक्षाला आयुष्यभरासाठीचा आधार म्हणून तिचे हात पिवळे करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. त्यामुळे संस्थाध्यक्ष एस. बी. सय्यद यांनी तिच्यासाठी वरशोध मोहीम सुरु केली. मूळचा शहागड व सध्या औरंगाबादेत स्कूल बस चालवून उदरनिर्वाह भागविणारा तरुण भेटला. लक्ष्मण असं त्याचं नाव. आकांक्षाला त्यानं पहिल्याच भेटीत पसंद केले; पण आडवी आली जात. आकांक्षालाही लक्ष्मण आवडला होता. लक्ष्मणच्या आई- वडिलांनी सुरुवातीला आढेवेढे घेतले; परंतु समजुतीनंतर त्यांनीही तिला स्वीकारण्यास संमती दर्शवली. आश्रय संस्थेच्या नेबरहूड समितीनेही ते दोघेही सज्ञान असून संमतीने विवाह करत असल्यामुळे परवानगी दिली. येत्या १२ डिसेंबरला शहरातील सहयोगनगरातील सर्वेश्वर गणेश मंदिरात त्यांचा विवाहसोहळा पार पडणार आहे. जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी आर. डी. कुलकर्णी यांच्यासह संस्था सचिव टी. के. गायकवाड, प्रा. हेमलता पाटील, अॅड. हेमा पिंपळे, प्रा. छाया सोंडगे, सामाजिक कार्यकर्त्या मनीषा तोकले, आशा धनवडे, उमेश होमकर, एस. एस. निर्मळ, दत्ता नलावडे हे वºहाडी म्हणून उपस्थित राहतील.
जातीची बंधने सैल, माणुसकीचा त्रिवेणी संगमआश्रय अल्पमुदती निवासगृहात आतापर्यंत हजारो महिला व मुलींना आधार मिळाला. निवासगृहाच्या २२ वर्षांच्या प्रवासात आतापर्यंत १९ मुलींचे लग्न लावून त्यांचे संसार उभे करण्यात आले. आकांक्षाच्या रुपाने २० वा विवाह सोहळा पार पडत आहे. निराश्रीत व आई- वडिलांच्या प्रेमाला पारखी झालेल्या आकांक्षाला लक्ष्मणच्या रुपाने सक्षम जोडीदार मिळाला असून दिमाखात सनईचे सूर घुमणार आहेत. त्या दोघांतील प्र्रेमाच्या मजबूत धाग्यापुढे जातीची बंधने सैल झाली. महत्त्वाचं म्हणजे या दोन भिन्न जातीतील जोडप्यांचे कन्यादान खुद्द संस्थाध्यक्ष एस. बी. सय्यद करणार आहेत. त्यांनी आतापर्यंत १९ मुलींचे कन्यादान केले असून आकांक्षासाठीही ते वडिलकीचे कर्तव्य निभावणार आहेत.