पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन-
अंकुशनगर (जि. जालना) – सहकार व शिक्षण चळवळीत महत्त्वाची भूमिका पार पाडलेल्या; तसेच समर्थ साखर कारखान्याचे अध्यक्षपद सांभाळणाऱ्या शारदाताई अंकुशराव टोपे यांच्यावर रविवारी (दि.2) अंत्यसंस्कार करण्यात आले. सुपुत्र तथा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी त्यांच्या पार्थिवास मुखाग्नी दिला.
मुंबईच्या बॉंबे हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान शनिवारी रात्री शारदाताई टोपे (वय ७३) यांचे निधन झाले होते. अंकुशनगर (ता. अंबड) येथील अंकुशराव टोपे सहकारी साखर कारखाना परिसरात शारदाताई यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अन्न व औषध प्रशासनमंत्री राजेंद्र शिंगणे, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, खासदार संजय जाधव, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उत्तम वानखेडे, आमदार कैलास गोरंट्याल, संतोष दानवे, नारायण कुचे, अंबादास दानवे, संदीप क्षीरसागर, बालाजी कल्याणकर, गुलाबराव देवकर, राजेश राठोड, कल्याणराव काळे, माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, माजी आमदार संतोष सांबरे, चंद्रकांत दानवे, शिवाजीराव चोथे, प्रकाश गजभिये, बदामराव पंडित, राजेश विटेकर, ए.जे. बोराडे, पंडितराव भुतेकर, मनोज मरकड, महेबूब शेख, कल्याणराव सपाटे, नानाभाऊ उगले, भीमराव डोंगरे आदी उपस्थित होते. खासदार जाधव, आमदार दानवे, आमदार गोरंट्याल, माजी मंत्री खोतकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी पाठविलेल्या शोकसंदेशाचे वाचन झाले. तत्पूर्वी, शारदाताई यांचे पार्थिव रविवारी सकाळी मूळगावी पाथरवाला बुद्रुक येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, पोलिस अधीक्षक चैतन्य एस. यांनी तेथे श्रद्धांजली अर्पण केली. टोपे परिवारातील मनीषा टोपे, वर्षा देसाई, संग्राम देसाई, बाळासाहेब पवळ, उत्तम पवार, सतीश टोपे, शरद टोपे, संजय टोपे, अमोल टोपे, ॲड. संभाजी टोपे, गणेश टोपे, दीपक टोपे, सूरज टोपे, संदीप टोपे, भैया टोपे आदी यावेळी उपस्थित होते.
राज्यावर कोरोनाचे संकट आहे. राज्यातील जनता हीच आता माझी माय आहे. जनतेसाठी मला बसून राहणे शक्य नाही. त्यामुळे अंत्यसंस्कारानंतरचे विधी 3 दिवसांत करीत कर्तव्य बजावणार आहे, असे आरोग्यमंत्री टोपे यांच्या वतीने नमूद करण्यात आले.

