पंढरपूर (प्रतिनिधी): पंढरपूर तालुक्यातील पेहे गावचे वैभव वाघमारे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत तिसऱ्यांदा बाजी मारली आहे. दोन वेळा यू.पी.एस.सी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या वाघमारे यांनी तिसऱ्यांदा आय.ए.एस परिक्षेत उत्तीर्ण होऊन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या आशा पल्लवित केल्या आहेत. ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबात जन्माला आलेले वैभव दासू वाघमारे हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी आदर्श बनले आहेत.
पंढरपूर तालुक्यातील पेहे येथील वैभव वाघमारे हे सध्या नागपूर येथे आय.आर.एस अधिकारी म्हणून कार्यरत होते. यू.पी.एस.सी परीक्षेत पहिल्यांदा उत्तीर्ण झाल्यानंतर वैभव वाघमारे यांनी रेल्वे प्रशासनात उच्चपदस्थ अधिकारी म्हणून सेवा बजावली. यानंतर पुन्हा आय.आर. एस परीक्षा उत्तीर्ण होऊन नागपूर येथे कार्यरत होते. सन 2018 साली झालेल्या आय. ए. एस परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. या परीक्षेत त्यांनी घवघवीत यश संपादन करून वैभव वाघमारे यांनी यशाच्या शिखराला गवसणी घातली. त्यांच्या या यशामुळे पंढरपूर तालुक्यात विशेष करून पेहे परिसरात त्यांचे कौतुक होत आहे.
वैभव वाघमारे यांचे प्राथमिक शिक्षण हे पेहे येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये झाले. त्यानंतर माध्यमिक शिक्षण नवोदय विद्यालय पलूस येथे झाले. त्यानंतर वालचंद महाविद्यालय सांगली येथील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये त्यांनी कॉम्प्युटर इंजिनीअरिंगचे शिक्षण पूर्ण केले. इंजिनिअरिंगची पदवी घेतल्यानंतर त्यांनी दोनदा यू.पी.एस.सी च्या परीक्षेत यश मिळवून तिसऱ्यांदा आय.ए.एस परीक्षेत यश मिळवले आहे. हे यश जिद्द, चिकाटी, विश्वासाच्या जोरावर मिळाले असून कुटुंब वडील शेतकरी आई व एक बहीण गृहिणी तर दुसरी बहीण शिक्षिका तसेच नातेवाईकांची खंबीर साथ असल्याची माहिती वैभव वाघमारे यांनी दिली.