मुंबई : बँकिंग व्यवस्थेपासून दूर असलेल्या लोकांना वित्तीय चक्रात आणण्यासाठी जन-धन योजनेसारखी प्रभावी योजना राबविल्यानंतर आता, ज्या गावातील लोकसंख्या पाच हजार किंवा त्यापेक्षा अधिक आहे, अशा ठिकाणी बँक शाखा उघडण्यासाठी बँकांनी प्राधान्य द्यावे, असे निर्देश भारतीय रिझर्व्ह बँकेने बँकांना दिले आहेत.

सध्या दुर्गम भागात बँकिंग सेवा देण्यासाठी बँकांनी ‘बिझनेस करस्पॉन्डंट’ची नेमणूक केली आहे. या प्रतिनिधींच्या माध्यमातून बँक खात्यात पैसे भरणे अथवा काढणे, रिकरिंग डिपॉझिट आदी जुजबी सेवा लोकांना पुरविल्या जातात. परंतु, बँकिंग सेवेत सहभागी होण्याची लोकांची वाढती संख्या लक्षात घेता अशा प्रतिनिधींची संख्या अत्यंत त्रोटक भासते. परिणामी, मागणी असूनही सेवा देणे शक्य होत नाही.
याचाच विचार करत आता बँकिंग सेवाचा विस्तार करण्याच्या दृष्टिकोनातून रिझर्व्ह बँकेने बँकांना खेड्याकडे चला, असे निर्देश दिले आहेत.