अमरावती: ‘आयुष्यात कितीही मोठं झालात तरी, चांगला माणूस व्हायचा प्रयत्न कायम केला पाहिजे. तुमचं लक्ष्य तुमच्यासमोर असतं तुम्ही खूप प्रयत्नही करता, पण ऐनवेळी आपण पाठ फिरवतो. त्यामुळं शेवटपर्यंत पाठ फिरवू नका, प्रयत्न करणं थांबवू नका.’, असा मोलाचा सल्ला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं विद्यार्थ्यांना दिला. तो अमरावतीतील एका कार्यक्रमात बोलत होता.
‘शाळेतील मित्र हे तुमचे खरे मित्र असतात आणि हेच मित्र तुमची गुंतवणूक असतात. आयुष्यात आपण कितीही मोठे झालो तरी मनुष्यधर्म सोडता कामा नये. कारण सर्वच गोष्टी या आपल्या सोबत कायम राहत नाही. राहतो तो फक्त आपला स्वभाव. त्यामुळं चांगला माणूस होण्याचा प्रयत्न करा’ असंही सचिन म्हणाला.
अमरावतीतल्या दर्यापूरमध्ये प्रबोधन विद्यालयात झालेल्या सत्कार समारंभात सचिननं विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची दिलखुलास उत्तर दिली. ‘सतत अपयश आलं तरी प्रयत्न सोडू नका’ असाही सल्ला सचिननं विद्यार्थ्यांना दिला.

