नवी दिल्ली – 05 फेब्रुवारी : बांगलादेशमध्ये होणारी एशिया कप आणि टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची आज (शुक्रवारी) घोषणा करण्यात आली. महेंद्र सिंह धोनी दोन्ही स्पर्धांसाठी टीम इंडियाचा कॅप्टन असणार आहे. त्याचबरोबर रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली, सुरेश रैना, युवराज सिंग, अजिंक्य रहाणे, रविंद्र जडेजा, हार्दिक पांड्या, आर. अश्विन, हरभजन सिंग, जसप्रीत बुमराह, आशीष नेहरा, पवन नेगी, मोहम्मद शमी यांचा समावेश आहे. अनुराग ठाकूर यांनीच पत्रकार परिषदेत भारतीय संघाची घोषणा केली.
विशेष म्हणजे दीर्घ कालावधीनंतर टीममध्ये पुनरागमन केलेल्या युवराजसिंग आणि हरभजनसिंगला ही टीम इंडीयामध्ये स्थान मिळाले आहे. गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियात झालेल्या वर्ल्ड कपमध्ये युवराज आणि हरभजनसिंग या दोघांनाही टीममधून वगळण्यात आलं होतं. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी या दोघांना निवडण्यात आलं.

