चपळगाव
– अक्कलकोट तालुक्याची वरदायिनी म्हणून ओळखले जाणारे कुरनूर धरण या वर्षी
कमी पावसामुळे कोरडेठाक पडले आहे. यामुळे अक्कलकोट, दुधनी व मैंदर्गी
नगरपरिषदेसह तालुक्यातील ३५ गावांसमोर व वन्यजीवांसमोरही पाण्याची भीषण
परिस्थिती निर्माण झाली आहे. अशी परिस्थिती भविष्यात निर्माण होऊ नये
म्हणून जलयुक्त शिवार अभियानांतर्गत लोकसहभागातून व प्रशासनाच्या
सहकार्याने धरणातील गाळ काढण्याचे काम सुरू आहे. आजपर्यंत चार लाख ३२ हजार
घनमीटर गाळ काढण्याचे काम झाले असून याला आता नाम फाउंडेशनचेही सहकार्य
लाभले आहे.
कुरनूर धरणातील गाळ काढण्यासाठी नाम फाउंडेशनने पुढाकार
घेतला आहे. नाम फाउंडेशनकडून धरणातील गाळ काढण्यासाठी तसेच खोलीकरण व
सरळीकरणाच्या कामांसाठी यंत्रसामग्री उपलब्ध करून देण्यात आली आहे. हरणा व
बोरी नदीवर कुरनूर धरण बांधले असून ४० किलोमीटर खोलीकरण व रुंदीकरणाचे काम
करण्यात येणार आहे. या वेळी नाम फाउंडेशनचे जिल्हा समन्वयक बसवराज नरे,
तहसीलदार अंजली मरोड, गटविकास अधिकारी उत्तमराव वाघमोडे, पी. एन. कोळी,
मनोज म्हेत्रे, डॉ. काशिनाथ उटगे, सिद्धाराम भंडारकवठे, कुरनूरचे सरपंच
व्यंकट मोरे, औदुंबर बंडगर, ग्रामविकास अधिकारी श्रीशैल स्वामी, नासीर पटेल
व तंटामुक्त अध्यक्ष केशव मोरे आदी उपस्थित होते.
