पंढरपूर (प्रतिनिधी)ः- मराठा आरक्षणासंदर्भात मुंबई येथे आयोजित केलेल्या मोर्चाला महाराष्ट्र शासन व पोलिस प्रशासनाने परवानगी नाकारल्याने पंढरपूरमधील सर्व मराठा संघटनांनी भाजपा सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याची अंत्ययात्रा काढून शासनाचा निषेध केला.
दि.3 ऑगष्ट रोजी मुंबई येथे आझाद मैदान ते मंत्रालय यादरम्यान सर्व मराठा समाजाच्या विविध संघटनांनी आयोजित केलेल्या मराठा आरक्षण मागणी संदर्भातील मोर्चाला महाराष्ट्र शासन व पोलिस प्रशासन यांनी परवानगी नाकारली. यामुळे शासनाचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज पंढरीत छत्रपती शिवाजी महाराज चौक -चौफाळा-स्टेशन रोड अशी भाजपा सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याची अंत्ययात्रा काढण्यात आली. यानंतर येथील सावरकर चौक येथे या पुतळ्याचे दहन करण्यात आले.
यादरम्यान सरकारविरोधी घोषणा देण्यात आल्या. यावेळी विविध मराठा समाजातील सामाजिक संघटना व पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्यने उपस्थित होते.
भाजपा सरकारविरोधात मराठा समाजात संताप-सागर कदम
मराठा आरक्षणासंदर्भात सरकारची उदासिन भुमिका पाहता हे शासन मराठा समाज विरोधक आहे असे दिसुन येते. मराठा आरक्षण प्रश्न मार्गी लावण्याऐवजी याबाबतच्या मागणीसाठी होणार्या आंदोलनांनाही दडपणार्या भाजपा सरकारविरुध्द मराठा समाजामध्ये तीव्र संतापाची भावना पसरलेली आहे. आत्ता मराठा समाज रस्त्यावर उतरुनच आरक्षण घेऊन दाखवेन. अशी प्रतिक्रिया यावेळी सामाजिक कार्यकर्ते सागर कदम यांनी व्यक्त केले.

