![]()
चोरीला गेलेले सोने दिले मिळवून ; वेळापूर पोलिसांची कामगिरी
वेळापूर ता.१२
चोरीला गेलेले पावणे तीन तोळे सोने वेळापूर पोलीसांनी तपास करून आरोपीना अटक करून फिर्यादीस परत मिळवून दिले. नुकतेच कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस निरीक्षक विश्वास नांगरे पाटील अकलूज दौऱ्यावर आल्यावर त्यांच्या हस्ते हा मुद्देमाल फिर्यादीस परत करण्यात आला. यावेळी जिल्हा ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विरेश प्रभू, अतिरीक्त पोलीस अधीक्षक मनिषा दुबुले, उपविभागीय अधिकारी निखिल पिंगळे, सपोनि विजय यादव, सपोनि अविनाश वाडेकर उपस्थित होते.
याबाबत सविस्तर हकीकत अशी,
फिर्यादी धनाजी आण्णा चव्हाण, रा. तांदुळवाडी, ता. माळशिरस यांचे घरी दि. २१/०७/२०१६ रोजी पहाटे तीन च्या सुमारास चोरी झाली होती. याबाबत वेळापूर पोलिसांत १३८/२०१६ हा भा.द. वि.सं. क. ३८० प्रमाणे गुन्हा नोंद करून पोलीस यंत्रणा आरोपी संतोष विठ्ठल आयवळे, वय : ३० वर्षे व शारुख विजय पवार, वय : २० वर्षे यांच्या मागावर होती.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सोलापूर ग्रामीण यांच्या मदतीने वेळापूर पोलिसांनी आरोपींस आटपाडी येथून दि.१२/०२/२०१७ रोजी ताब्यात घेऊन त्यांच्याकडे असणारा मुद्देमाल जप्त केला होता. दीड तोळे वजनाचे सोन्याचे घंटण व सव्वा तोळे वजनाचे घंटन सोबत एक मोबाईल असा तीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल फिर्यादीस दाखवून ओळख पटवून कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस निरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्या हस्ते फिर्यादीस परत करण्यात आला.
या संपूर्ण प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी निखील पिंगळे व वेळापूरचे सपोनि विजय यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस फौजदार हनुमंतराव देशमुख, पोलीस हवालदार वासुदेव गुरव, पोलीस कॉन्स्टेबल दत्तात्रय खरात यांनी केला. या प्रकरणाच्या यशस्वीरीत्या तपासाबद्दल कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस निरीक्षक विश्वास नांगरे पाटील, जिल्हा ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विरेश प्रभू, अतिरीक्त पोलीस अधीक्षक मनिषा दुबुले, उपविभागीय अधिकारी निखिल पिंगळे यांनी वेळापूर पोलिसांचे कौतुक केले.
■ फोटो ओळी : मुद्देमाल परत करताना नांगरे पाटील, विरेश प्रभू, मनीषा दुबुले, निखिल पिंगळे, विजय यादव, हनुमंतराव देशमुख आदी.
