सोलापूर – प्रत्येक माणसाची सामाजिक व आर्थिक परिस्थिती वेगळी असते. आहे त्या परिस्थितीत चांगले करण्याचा प्रयत्न करा. आपल्या आर्थिक परिस्थितीचा बाऊ करू नका. माणसाची गरिबी ही परिस्थितीत नसून मानसिकतेत असते, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी केले.
या वेळी व्यासपीठावर प्राचार्य डॉ. शंकर नवले, डॉ. एस. एच. पवार, ‘सकाळ’चे सहयोगी संपादक अभय दिवाणजी, सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाचे कॅम्पस डायरेक्टर संजय नवले, युनिट मॅनेजर किसन दाडगे आदी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांशी संवाद साधताना डॉ. भारुड यांनी त्यांचा जीवनप्रवास सांगितला. ते म्हणाले, ‘‘दहावी, बारावीत चांगले गुण मिळविले. पुढे मेडिकलसाठी गेलो. मेडिकल कॉलेजमध्ये शिकताना इंग्रजी येत नव्हते, यासाठी रोज रात्री डिक्शनरी घेऊन इंग्रजीचा अभ्यास केला. पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी तसेच त्याच्या प्रवेशपरीक्षेची तयार करण्यासाठी जवळ तितके पैसे नव्हते. मित्राच्या सांगण्यानंतर यूपीएससीचा अर्ज भरला. दीड महिन्यात या परीक्षेचा अभ्यास केला. प्रिलीममध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर मुख्य परीक्षेसाठी तयारी सुरू केली. या सर्व परीक्षेसाठी कोणाचेही मार्गदर्शन न घेता अभ्यास केला. हा अभ्यास करताना आठ तास काम आठ तास अभ्यास याप्रमाणे माझा जीवनक्रम होता.’’
‘‘मुलाखतीत यश मिळणार नाही, या अपेक्षेने मी मुलाखतीला सामोरे गेलो होतो. अपयश येणार हे माहीत असताना त्या अपयशाला आनंदाने सामोरे जाण्याचा निर्णय मी घेतला. मात्र, या मुलाखतीत मी उत्तीर्ण झालो. सकारात्मक विचार केल्याने वाईट परिस्थितीतही माणूस जिंकू शकतो,’’ असे त्यांनी नमूद केले.
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111




