अहमदनगर
नगर जिल्ह्यात काल रात्रीपासून शेतकरी संपला हिंसक वळण लागले असून शेतकऱ्यांनी अनेक वाहने अडवून जाळपोळ केली. त्यानंतर, आज पहाटेपासूनच आंदोलक आक्रमक झालेत, तर पोलिसांनीही कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यामुळे परिसरात तणावाचं वातावरण आहे.
रविवारी नाशिकमध्ये झालेल्या शेतकऱ्यांच्या महत्त्वपूर्ण बैठकीत सोमवारी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक देण्यात आली होती. मुख्यमंत्री सर्व मागण्या पूर्ण करीत नाहीत तोपर्यंत मागे न हटण्याचा निर्धार करीत आणखी चार दिवस संप सुरूच ठेवण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला होता. त्यानंतर, काही तासांतच नगरमधील वातावरण तापायला सुरुवात झाली. शेतकऱ्यांनी वाहनांची जाळपोळ सुरू केल्याचं पाहून पोलिसांनीही आंदोलकांच्या गाड्या फोडल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. नगर तालुक्यात शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्यांच्या गाडीची बंदुकीने तोडफोड केली जात असताना बंदूक काचेत अडकून पडली. पोलिसांनी दुचाकींचीही तोडफोड केल्याची तक्रार शेतकरी आंदोलक करीत आहेत.
दरम्यान, या आंदोलनात शिवसेना उतरल्यानं राडा वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी शिवसेनेच्या प्रमुख कार्यकर्त्याची धरपकड सुरू केली आहे. जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे यांच्यासह काही जणांना रात्रीच ताब्यात घेतले आहे. आज पुकारलेल्या ‘महाराष्ट्र बंद’मध्ये काही व्यापारी संघटनाही सहभागी होत असून त्यांनी दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
Posted inMaharashtra





