👁 11 Views

शेतकरी संपातील पहिली आत्महत्या, कर्जबाजारी तरुण शेतक-यानं संपवली जीवनयात्रा

येवला(नाशिक), दि. 6 – राज्यव्यापी शेतकरी संपाचा विषय तापलेला असताना एका तरुण शेतक-यानं कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची माहिती मिळत आहे. आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरलेल्या शेतक-यांचा संप या आत्महत्येमुळे अधिक चिघळण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे ज्या शेतक-यानं आत्महत्या केली आहे, त्यानंही ”महाराष्ट्र बंद”मध्ये सक्रिय सहभाग नोंदवला होता.  
नवनाथ चांगदेव भालेराव असे आत्महत्या केलेल्या शेतक-याचे नाव असून ते 30 वर्षांचे होते. सोमवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास विष पिऊन त्यांनी स्वतःची जीवनयात्रा संपवली आहे. कर्जबाजारीपणाला कंटाळून त्यांनी आयुष्य संपवल्याची माहिती मिळत आहे.   
गेल्या पाच दिवसांपासून पाटोदा (नाशिक ) येथे शेतकरी आंदोलनात भालेराव यांनी सक्रिय सहभाग घेतला. 5 जून रोजी मध्यरात्री भालेराव यांनी विष पिऊन स्वतःचे आयुष्य संपवले. कर्जबाजारी व नापिकीला कंटाळून भालेराव यांनी आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. 
1 जूनपासून शेतकऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या संपात नवनाथ भालेराव यांनी सहभाग घेऊन  शासनाने शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे, अशी मागणी लावून धरली होती. 
नवनाथ हे एकत्रपद्धत कुटुंबात राहत होते. त्यांची संपूर्ण शेती वडिलांच्या नावावर असून त्यांनी आपल्या शेतात तीन वर्षापासून द्राक्ष बागेची लागवड केली होती. त्यासाठी वडिलांनी  नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून पिंपरी सोसायटीमार्फत 13 मे 2013 रोजी सुमारे 4,50,000 रुपयांचे कर्ज घेतले होते. 
गेल्या वर्षी द्राक्षाचे पिक चांगले आले मात्र अस्मानी संकटामुळे हाताशी आलेले पिक गेले. तर यंदा द्राक्ष बागेवर किडींचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पन्न मिळाले नाही. द्राक्षबागेसाठी घेतलेल्या औषधांची उधारीही भालेराव यांच्यावर होती, अशी माहिती आहे.  
दरम्यान भालेराव यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, आईवडील व भाऊ असा परिवार आहे.
शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसह विविध मागण्यांना पाठिंबा देण्यासाठी किसान क्रांती मोर्चातर्फे आयोजित राज्यव्यापी बंदला नाशिक जिल्ह्यात सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. काही ठिकाणी झालेले दगडफेकीचे प्रकार तर खडक माळेगाव येथे झालेला लाठीमार असे किरकोळ प्रकार वगळता बंद शांततेत पार पडला. ठिकठिकाणी झालेले रास्तारोको, मुख्यमंत्री आणि सदाभाऊ खोत यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यांचे दहन,मेणबत्ती मोर्चा आदिंनी हे आंदोलन झाले. यामुळे ग्रामीण भागातील उलाढाल तसेच व्यवहार ठप्प झाले होते. शहरात या आंदोलनाला संमिश्र प्रतिसाद लाभला.
किसान क्रांती मोर्चाने दिलेल्या महाराष्ट्र बंदच्या हाकेला जिल्ह्यात सर्वत्र चांगला प्रतिसाद लाभला. या बंदला विविध पक्ष आणि संघटनांनी पाठिंबा जाहीर केला होता. सर्वच ठिकाणी सकाळपासूनच सर्व व्यवहार बंद होते. मात्र या बंदचे शहार भागामध्ये फारसा परिणाम जाणवला नाही. जिल्ह्यात ठिकठिकाणी रास्तारोको आंदोलन करण्यात आले. यामध्ये विविध पक्षांच्या नेत्यांसह शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. निफाड, कळवण, दिंडोरी,सुरगाणा, मालेगाव, येवला, त्र्यंबकेश्वर, सिन्नर अशा सर्वच तालुक्यांमध्ये आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. निफाड तालुक्यातील खडक माळेगाव येथे रास्तारोको आंदोलन करणाऱ्यांना पांगविण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला.
चांदवड तालुक्यातील खडकजांब येथे काही तरुण शेतकऱ्यांनी मुंबई- आग्रा महामार्गावर जळती टायर टाकून रास्तारोको केले. यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. त्र्यंबकेश्वर तालुक्यात आंदोलकांनी एस. टी. बसवर दगडपेक करून काचा फोडल्या.विविध ठिकाणी सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून निषेध करण्यात आला. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसच सदाभाऊ खोत यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यांचे दहन करण्यात आले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *