उद्धव ठाकरे यांनी पुन्हा ठणकावले
मुंबई, दि.18 (प्रतिनिधी) – जुलै महिन्यांत होणाऱ्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणूकीत उमेदवार घोषित करण्यावरुन केंद्रातील एनडीए सरकारमध्ये संभ्रम कायम आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्याच नावाच आग्रह धरला आहे. भाजपला त्यांच्या नावाबद्दल आक्षेप असेल तर आमची दुसरी पसंत शेतकऱ्यांचे तारणहार एम. एस. स्वामीनाथन यांना असेल, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी आपले स्पष्ट मत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना ठणकावून सांगितले आहे.
राष्ट्रपतीपदाच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर भाजपचे नेते विरोधी पक्षांसह एनडीएतील घटक पक्षांच्या प्रमुखांच्या भेटी घेऊन त्यांची मते जाणून घेत आहेत. भाजपचे अध्यक्ष अमित शहा हे तीन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आले होते. शिवसेना हा सुद्धा एनडीएचा घटक पक्ष आहे. शिवसेनेकडील खासदार आणि आमदारांची संख्या पाहता शिवसेनेकडे 25 हजारांहून अधिक मतांचा कोटा आहे. त्यामुळे शिवसेनेची मते भाजपसाठी महत्त्वाची ठरणार आहे. त्यादृष्टीकोनातून विधानसभा निवडणूकीनंतर शिवसेना आणि भाजपमधील ताणलेल्या टोकाच्या संबंधानंतर एवढेच नव्हे तर शिवसेनेने वारंवार सत्तेतून बाहेर पडण्याच्या दिलेल्या इशाऱ्यानंतरही अमित शहा यांनी रविवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची रविवारी “मातोश्री’ निवासस्थानी भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे उपस्थित होते.
राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच निर्णय घेतील. त्यांच्या निर्णयाला आपण पाठींबा द्यावा, अशी विनंती शहा यांनी उद्धव ठाकरेंना केली. पंरतु, हे नाव आम्हाला अगोदर कळायला हवे, असे सांगतानाच सरसंघचालक मोहन भागवत यांच्याच नावाला आमची पहिली पसंती असल्याचे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. मात्र, भागवत यांच्या नावाला आक्षेप असल्यास शेतकऱ्यांच्या भल्यासाठी झटणारे कृषीतज्ज्ञ एम. एस. स्वामीनाथन यांचे नाव त्यांनी पुढे केले. मात्र, शिवसेनेच्या या भूमिकेवर शहा यांनी कोणतेच आश्वासन दिलेले नाही, अशी माहिती सुत्रांनी दिली. त्यामुळे भाजप आता कोणता निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दानवे, पाटील यांना बैठकीतून वगळले
राष्ट्रपतीपदाच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर अमित शहा हे उद्धव ठाकरे यांच्या भेटीला गेले होते. त्यांच्यासोबत मुख्यमंत्री फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे व महसूलमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते. मात्र, उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या चर्चेदरम्यान रावसाहेब दानवे व चंद्रकांत पाटील यांना वगळण्यात आले. त्यामुळे त्यांना “मातोश्री’च्या सभागृहात बसून राहावे लागले. केवळ अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांनीच उद्धव ठाकरेंशी चर्चा केली. सुमारे तासभर ही चर्चा झाल्याचे सुत्रांनी सांगितले.बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा




