👁 12 Views

हॉकीत भारताची पाकवर मात

लंडन : एकीकडे चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत भारताला पाकिस्तानकडून मानहानीकारक पराभव पत्करावा लागलेला असताना हॉकीत मात्र भारतीय संघाने पाकिस्तानला ७-१ असे पराभूत करत भारतीयांना दिलासा दिला. हॉकी वर्ल्ड लीग स्पर्धेत (उपांत्य टप्पा) भारताने हा विजय मिळवून उपांत्यपूर्व फेरीतील आपले स्थान निश्चित केले. भारताचा या स्पर्धेतील हा सलग तिसरा विजय ठरला. याआधी, स्कॉटलंड, कॅनडा यांच्यावर भारताने मात केली होती.

ड्रॅगफ्लिकर हरमनप्रीतसिंग (१३ वे आणि ३३वे मिनिट), तलविंदरसिंग (२१ वे आणि २४वे मिनिट), आकाशदीप सिंग (४७ वे आणि ५९वे मिनिट) व प्रदीप मोर (४९वे मिनिट) यांनी भारतासाठी गोल केले. पाकिस्तानला एकमेव गोल नोंदविता आला तो ५७व्या मिनिटाला. मोहम्मद उमरने हा गोल केला.

या तीन विजयांसह भारत ब गटात अव्वलस्थानी असून नेदरलॅण्डसलाही भारताने मागे टाकले आहे. या गटात पाकिस्तान मात्र अखेरच्या स्थानी आहे. त्यांना एकही सामना अद्याप जिंकता आलेला नाही. भारताची आता नेदरलँड्सची पुढील लढत होणार आहे. हा सामना मंगळवारी होईल. तर पाकिस्तानचा पुढचा सामना स्कॉटलंडशी होईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा

पाकिस्तानने या सामन्यात सुरुवात छान केली पण केवळ १० मिनिटांपर्यंत त्यांचा जोर दिसून आला. पाकिस्तानने सर्वप्रथम पेनल्टी कॉर्नर मिळविला पण त्याचे गोलमध्ये रूपांतर करण्यात त्यांना यश आले नाही. त्यानंतर मात्र भारताने सामन्यावर नियंत्रण मिळविण्यास सुरुवात केली. भारताला १३व्या मिनिटाला आघाडी मिळाली. हरमनप्रीतने भारताचे खाते उघडून दिले. पेनल्टी कॉर्नरवर भारताला ही आघाडी मिळाली. चार मिनिटांनी भारताला आणखी एक पेनल्टी कॉर्नर मिळाला पण हरमनप्रीतचा फ्लिक पाकिस्तानचा गोलरक्षक अमजद अलीने अडवला. त्यानंतर पुन्हा भारताला आघाडी मिळाली ती तलविंदरसिंगमुळे. त्याने सतबीरसिंग व एस. व्ही. सुनील यांच्या साथीने हा गोल केला. तलविंदरने नंतर आपल्या खात्यात आणखी एक गोल जमा करत भारताची आघाडी ३-० अशी वाढविली.
उत्तरार्धात, भारताच्या आक्रमणाची धार कायम राहिली. हरमनप्रीतने दुसऱ्या सत्राच्या पहिल्या काही मिनिटांतच गोल केला आणि आघाडी ४-० अशी वाढविली. भारताचा गोलरक्षक आकाश चिकटेने इथे सफाईदार कामगिरी केली. पाकिस्तानकडून झालेली काही आक्रमणे त्याने थोपवून धरली. भारताला त्यानंतर आघाडी वाढविण्याची संधी दिली ती आकाशदीपने. सरदारसिंगच्या साथीने त्याने भारताचा पाचवा गोल केला. आकाशदीपनेच भारताला सहावा गोलही करून दिला. प्रदीप मोरने कळस चढवत भारताच्या गोलची संख्या सातवर नेली.

भारतीय हॉकीपटूंनी लावल्या काळ्या फिती

पाकिस्तानविरुद्धच्या या सामन्यात भारतीय हॉकीपटूंनी दंडावर काळ्या फिती लावल्या आणि भारतीय सैन्यावर झालेल्या हल्ल्यांत मृत्युमुखी पडलेल्या सैनिकांना आदरांजली वाहिली. भारतीय हॉकी संघाच्या सपोर्ट स्टाफनेही काळ्या फिती लावल्या.

भारतीय हॉकीपटूंनी नेहमीच मृत सैनिकांप्रती आदराची भावना व्यक्त केली आहे. पी.आर. श्रीजेशने २०१६च्या आशियाई अजिंक्य स्पर्धेचे विजेतेपद सैनिकांना अर्पण केले होते.

हॉकी इंडियाचे सचिव मोहम्मद मुश्ताक म्हणाले की, भारतीय हॉकीपटूंनी नेहमीच भारतीय लष्कराला पाठिंबा दिला आहे. सैनिकांच्या त्यागामुळे हॉकीपटूंना नेहमीच प्रेरणा मिळाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *