👁 9 Views

आषाढी यात्रा सोहळ्यासाठी ज्ञानेश्वर दर्शन मंडप भाविकांसाठी सज्ज, : भाविकांना मिळणार मोफत चहा, स्वच्छ पाणी औषधोपचार

पंढरपूर : प्रभू पुजारी
ऊन, वारा, पाऊस, थंडी यापासून भाविकांचे संरक्षण व्हावे शिवाय रांगेतून शिस्तीत अन् भक्तिमय वातावरणात श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेचे दर्शन व्हावे म्हणून मंदिराच्या समोरील बाजूला श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने श्री संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप बांधण्यात आले आहे़ आषाढी यात्रा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर हे दर्शन मंडप सज्ज झाल्याची माहिती दर्शन मंडपप्रमुख बी़ आऱ पावले यांनी दिली़
या दर्शन मंडपाची रंगरंगोटी करण्यात आली असून, आकर्षक विद्युतरोषणाई करण्यात आली आहे़ दर्शन मंडपात भाविकांना उकाडा जाणवू नये म्हणून ७५ पंखे बसविण्यात आले आहेत़ या दर्शन मंडपात आषाढीदरम्यान नवमी, दशमी, एकादशी आणि द्वादशी हे चार दिवस भाविकांना मोफत चहा, स्वच्छ पिण्याचे पाणी, औषधोपचार देण्यात येणार असून, ही यंत्रणा सज्ज आहे़ भाविकांना सूचना देण्यासाठी साऊंड सिस्टीम, माहितीसाठी ठिकठिकाणी सूचना फलक लावण्यात आले आहेत़ २४ तास वीजपुरवठा होण्यासाठी जनरेटरची सोय केली आहे़ ८० शौचालये सज्ज ठेवण्यात आली आहेत़
दर्शन मंडपातून दर्शनासाठी मार्गस्त होणाऱ्या भाविकांना स्वच्छ पाणी देण्यासाठी २०, चहा देण्यासाठी २० कर्मचारी कार्यरत आहेत़ दर्शन मंडप २४ तास स्वच्छ राहावा यासाठी ४० कर्मचारी सेवा बजावत आहेत़ बरेच भाविक पान-तंबाखूचे सेवन करणारे असल्याने थुंकण्यासाठी वाळू भरलेले डबे आणि कचरा टाकण्यासाठी कचराकुंड्या ठेवण्यात आल्या आहेत़
८० शौचालये स्वच्छ राहावीत यासाठी १० कर्मचारी स्वच्छतेसाठी कायमस्वरुपी तेथे असतील़ भाविकांच्या आरोग्यसेवेसाठी तज्ज्ञ डॉक्टर, आरोग्य सेवकांसह १० कर्मचारी कार्यरत आहेत़ आणीबाणीच्या काळात लिफ्टची सोय आहे़ प्रत्येक गाळ्यात सिलेंडर ठेवले आहेत़ शिवाय आपत्कालीन कर्मचारी कार्यरत आहेत़ भाविकांच्या संरक्षणासाठी पोलीस कर्मचारी व होमगार्ड तैनात केले आहेत़ याशिवाय वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्थांचे १५० स्वयंसेवक मदतीसाठी कार्यरत आहेत़ त्यामुळे दर्शन मंडपात भाविकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही, याची काळजी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती घेत असल्याची माहिती बी़ आऱ पावले यांनी दिली़
————————
दर्शन मंडपात थांबतील चार ते पाच तास भाविक
श्री संत ज्ञानेश्वर दर्शन मंडपात एकूण ८ गाळे असून, एका गाळ्याची क्षमता साधारणत: ३००० पेक्षा जास्त भाविक थांबतील अशी आहे़ त्यामुळे दर्शन मंडपात एकूण २५ हजारांपेक्षा जास्त भाविक रांगेत असतील, असा अंदाज आहे़ भाविक दर्शन मंडपात प्रवेश केल्यानंतर दर्शन मंडपातून बाहेर पुढे पांडुरंगाच्या दर्शनाला जाण्यासाठी किमान ४ ते ५ तासांचा कालावधी लागणार आहे़ दर्शन मंडपात टप्प्याटप्प्याने भाविक प्रत्येक गाळ्यातून सोडण्यात येतील़ काही अनुचित प्रकार घडल्यास आपत्कालीन मार्गातून भाविकांना काढण्याची सोय करण्यात आली आहे़ आषाढी यात्रा कालावधीत भाविकांची कसलीही गैरसोय होणार नसल्याचे बी़ आऱ पावले यांनी सांगितले़
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *