मुंबई: चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारताचा पाकिस्तानविरुद्ध झालेला पराभव आजही कोट्यवधी चाहत्यांच्या मनाला बोचत आहे. बुमराहनं टाकलेला नो-बॉल हा या सामन्यात टर्निंग पॉईंट ठरला होता. तोच नो-बॉल बुमराहची अजूनही पाठ सोडत नसल्याचं दिसतं आहे.
कारण की, जयपूरच्या ट्रॅफिक पोलिसांनी बुमराहच्या ‘नो बॉल’चं उदाहरण देत ट्रॅफिकच्या नियमांचं पालन करण्याचं आवाहन करणारे चक्क पोस्टर्स लावले आहेत. पण या पोस्टर्समुळे बुमराह खूपच नाराज झाला आहे. जयपूर पोलिसांच्या या पोस्टरला बुमराहनं ट्वीटरवरुन उत्तर दिलं आहे.
याबाबत बुमराहनं एक ट्विट करुन जयपूर ट्रॅफिक पोलिसांना मार्मिक शब्दात सुनावलं. ‘अतिशय उत्तम जयपूर ट्रॅफिक पोलीस! तुम्ही दाखवून दिलंत की, देशासाठी आपलं सर्वोत्कृष्ट देण्याऱ्या खेळाडूबाबत तुमच्या मनात किती सन्मान आहे.
पण तुम्ही काळजी करु नका, मी तुम्ही केलेल्या चुकीची थट्टा करणार नाही, कारण की, मला माहितीय की, चूक ही माणसांकडूनच होते.
दरम्यान, बुमराहच्या या ट्विटनंतर जयपूर ट्रॅफिक पोलिसांना आपली चूक उमगली आणि त्यांनी या संपूर्ण प्रकरणाचं ट्विटरवरच स्पष्टीकरण दिलं.
प्रिय बुमराह, तुला किंवा कोट्वधी क्रिकेट चाहत्यांना दुखवण्याची आमची अजिबात भावना नव्हती.
आम्ही फक्त या प्रसंगातून ट्रॅफिकबाबत लोकांना जागरुक करण्याचा प्रयत्न करत होतो.
तू युवकांसाठी आदर्श आहेस आणि आम्हा सर्वांसाठी प्रेरणास्त्रोत.
असं ट्वीट करुन जयपूर ट्रॅफिक पोलिसांनी या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, बुमराहचा अपमान करण्याचा आमचा हेतू नव्हता असं स्पष्टीकरण पोलिसांनी दिलं असलं तरीही हे वादग्रस्त पोस्टर हटवणार की नाही? याबाबत त्यांनी कोणतीही माहिती दिलेली नाही.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!







