वॉशिंग्टन : भारताचं संपूर्ण लक्ष आता पाकिस्तानकडून चीनकडे वळू लागले असून, त्यादृष्टीने भारताने आपल्या आण्विक धोरणात आणि आधुनिकीकरणात बदल सुरू केले आहेत, असा दावा अमेरिकेतील दोन आण्विक तज्ज्ञांनी केला आहे.
‘आफ्टर मिडनाइट’ आॅनलाइन नियतकालिकाच्या अंकात यासंबंधी लेख प्रसिद्ध झाला असून, त्यात भारत एक अण्वस्त्र तयार करीत असल्याचे म्हटले आहे. या अण्वस्त्रामुळे दक्षिण भारतातूनही चीनवर हल्ला करणे शक्य होऊ शकेल, असा दावाही या लेखात करण्यात आला आहे.
‘इंडियन न्युक्लिअर फोर्स २0१७ ‘ या शीर्षकाखालील लेखात हॅन्स एम क्रिस्टिन्स आणि रॉबर्ट एक नॉरिस यांनी म्हटले आहे की, भारताकडे जवळपास १५0 ते २00 न्यूक्लीअर वॉरहेड तयार करण्यासाठी पुरेसे प्लूटोनिअम असल्याचा अंदाज आहे. मात्र भारताने केवळ १२0 ते १३0 तयार केले आहेत. आतापर्यंत सातत्याने पाकिस्तानला डोळ्यासमोर ठेवून आखण्यात येणाऱ्या आण्विक धोरणात भारताने चीनवर लक्ष देण्यास सुरुवात केली आहे.
भारताने जवळपास ६00 किलो प्लूटोनिअमची निर्मिती केली असून, त्यातून १५0 ते २00 वॉरहेड तयार करणे शक्य आहे. मात्र त्या सर्वांचा भारताने अद्याप वापर केलेला नाही, असेही या दोघांचे म्हणणे आहे. पाकिस्तानपासून स्वत:चे रक्षण करणे हा आण्विक शस्त्रे विकसित करण्यामागील भारताचा प्रमुख उद्देश होता. आता चीनला डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करीत आहे. भारताजवळ सात आण्विक शस्त्रे आहेत. विमानातून चालवली जाणारी दोन, जमिनीवरून मारा करता येणारी चार तर समुद्रातून चालवली जाणारी एक अशी ती सात आहेत, याचा उल्लेख या दोन्ही लेखकांनी लेखामध्ये केला आहे. (वृत्तसंस्था)
>चार प्रणालींवर काम सुरू
किमान अजून चार प्रणालींवर भारतात काम सुरू असून, वेगाने त्यांचेही आधुनिकीकरण केले जात आहे. लवकरच ही क्षेणणास्त्रे भारत तैनात करेल असेही या दोन्ही तज्ज्ञांनी म्हटले आहे.










