18 Jul. 2017
नवी दिल्ली : सत्तरच्या दशकात जनसंघ देशभरात आपली ओळख निर्माण करत होता. पण दक्षिणेत मात्र, त्यांचा फारसा प्रभाव पडत नव्हता. पण अशावेळी आंध्रप्रदेशमध्ये एक युवा कार्यकर्ता अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांचे पोस्टर चिपकवण्यात व्यस्त होता.
एकेकाळी पोस्टर चिपवकणारा कार्यकर्ता मुप्पावरापू व्यंकय्या नायडू हे आज एनडीएच्या उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार आहेत. आणि उपराष्ट्रपतीपदी त्यांची निवड जवळजवळ निश्चित मानली जात आहे.
आंध्रप्रदेशमधील नेल्लूर जिल्ह्यात एका शेतकरी कुटुंबात व्यंकय्या नायडू यांचा जन्म झाला. तिथपासूनचा त्यांचा आजवरचा प्रवास खडतर आहे. नायडू हे आंध्रप्रदेश विधानसभेत दोनदा निवडून गेले आहेत. पण ते लोकसभेत कधीही निवडून गेले नाही. पण तरीही तीन वेळेस ते कर्नाटकमधून राज्यसभेत गेले आहेत. आताही ते राज्यसभेवरच असून सध्या राजस्थानचं प्रतिनिधित्व करत आहेत.
उपराष्ट्रीपती पदाचे उमेदवार म्हणून जेव्हा नायडू यांच्या नावाची घोषणा झाली त्यावेळी पंतप्रधान मोदींनी त्यांच्यासाठी खास तेलगु शब्दा ‘गारु’चा वापर केला. तेलगुमध्ये हा शब्द एखाद्याला सन्मानार्थ वापरला जातो.
‘एक शेतकऱ्याचा मुलगा, व्यंकय्या नायडू गारु यांना सार्वजनिक जीवानात वावरण्याचा अनेक वर्षांचा अनुभव आहे. तसेच राजकीय वर्तुळातही त्यांचं नेहमीच कौतुक होत असतं.’ असं ट्वीट मोदींनी केलं आहे.
एकेकाळी अडवाणींच्या जवळ असणाऱ्या नायडू यांनी 2014च्या लोकसभा निवडणुकीआधी मोदी हेच पंतप्रधान व्हावेत यासाठी आग्रही होते. नायडू सध्या सूचना आणि प्रसारण, नगरविकास मंत्रालयाचा कारभार सांभाळत आहेत. ते मोदी सरकारमध्ये संसदीय कार्यमत्री देखील होते. आणबाणीच्या काळात नायडू हे एबीव्हीपीचे कार्यकर्ते होते आणि त्यावेळी त्यांना अटकही करण्यात आली होती.
अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये नायडू हे ग्रामविकास मंत्री होते. जुलै 2002 ते ऑक्टोबर 2004 पर्यंत ते भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. पण 2004 साली लोकसभा निवडणुकीत भाजपच्या पराभवानंतर त्यांनी अध्यक्षपद सोडलं होतं. पण 2014 मोदी सरकारमध्ये त्यांना नगरविकास खात्यासारखं महत्वाचं खातं देण्यात आलं. त्यामुळे पोस्टर चिपकवणारा कार्यकर्ता ते उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार असलेल्या नायडू यांचा प्रवासही तितकाच खडतर आहे.











