19 Jul.2017
मुंबई: मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री उमा भेंडे यांचे आज (19 जुलै) आज निधन झाले. राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या 72 वर्षांच्या होत्या. आज रात्री त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. हृदयविकारानं त्रस्त असलेल्या उमाताई गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. वयोमानामुळं त्यांची प्रकृती बरीच खालावली होती. अखेर आज दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्च्यात पती प्रकाश भेंडे, मुले प्रसाद भेंडे आणि प्रसन्न भेंडे, सूनबाई श्वेता महाडिक-भेंडे आणि नातवंड असा परिवार आहे.
साठ व सत्तरच्या दशकातील अनेक चित्रपटांतून उमा भेंडे संस्मरणीय भूमिका केल्या होत्या. 1960 साली ‘आकाशगंगा’ या चित्रपटातून त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. मधुचंद्र, आम्ही जातो आमुच्या गावा, अंगाई, काका मला वाचवा, शेवटचा मालुसरा, मल्हारी मार्तंड, भालू, स्वयंवर झाले सीतेचे हे त्यांचे गाजलेले मराठी चित्रपट आहेत. त्यांनी मराठीसोबतच तामिळ, तेलगू चित्रपटांमध्येही काम केले. कोल्हापूरच्या असलेल्या उमाताईंचं मूळ नाव अनुसया असं होतं. ‘हवास तू’ हे त्यांचं गाणं खूपच गाजलं होतं. ‘गुडिया हमसे रुठेगी…’ हे हिंदी गाणंही त्यांच्यावरच चित्रित करण्यात आलं होतं.











