पुण्यामध्ये “Retired but not Tired” म्हणजेच सेवानिवृत्त युवांच्या संमेलनासाठी विविध क्षेत्रातील जेष्ठ कृषी आधिकारी, तज्ञ, विचारवंत, शेतकरी संघटनेचे नेते, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. “फोरम ऑफ़ इंटलेकच्युअल्स” चे अध्यक्ष श्री. सतीश देशमुख ह्यांनी प्रास्ताविकात ह्या अभिनव संकल्पनेबाबतची पार्श्वभूमी, जेष्टांच्या कौशल्य, अनुभव व ज्ञान – भांडाराचा “शेतकरी व एकात्मिक ग्रामीण विकास” साठी विनियोग ह्याबाबतची भूमिका विषद केली. आज कर्जमुक्ती हा मुद्दा चर्चेच्या केंद्रस्थानी असला तरी अनेक ज्वलंत प्रश्न आहेत. अंत्यवस्थेत असलेल्या शेतकऱ्याला ‘ स्वामिनाथन शिफारशीच्या’ ऑपरेशनची जरुरी आहे, कर्जमुक्ती हे फक्त सलाईन आहे. अपूर्ण सिंचन प्रकल्पांची कामे, 12 तास वीज, अन्न प्रक्रिया उद्योगामध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक, निर्यात स्वातंत्र्य, शेतकरी विरोधी कायदे असे अनेक विषय आहेत. शेतकर्यांच्या लढ्यासाठी अश्या वैचारिक योद्धयांची साथ मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली.
ह्या प्रसंगी श्रीमती कल्पनाताई साळुंके, अध्यक्षा पाणी पंचायत यांनी महाराष्ट्राच्या जलसंपत्तीचे न्याय वाटपाबाबतच्या नियोजनाचे आग्रही मत मांडले. पाणलोट क्षेत्र विकास, पर्यावरण समतोल व आधुनिक शेती व्यवसाबाबतच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. पाण्याच्या ढासळत्या जलपातळीवर गंभीर चिंता व्यक्त करून आपण भविष्यातील पिढीचे पाणी संपवीत आहोत असा इशारा दिला. पाणी, माती व पर्यावरण ह्या त्रिसूत्रीच्या तत्वावर काम करण्याची आवश्यक्यता आहे असे सांगितले.
कॉम्रेड शांता रानडे यांनी शेतीच्या शोधापासून ते विविध आंदोलनातील स्त्रियांच्या योगदानाबद्दल माहिती दिली. स्त्रियांचा शेती व शेतीपूरक उद्योगामध्ये 65% सहभाग असल्याचे सांगितले. स्त्रियांच्या शिक्षण, आरोग्य, कुपोषण, आत्महत्याग्रस्त कुटुंबाची जबाबदारी, विस्थापितांच्या हालअपेष्टा, स्त्रियांना दुय्यम वागवणूक ह्याबाबत आकडेवारीसकट बाजू मांडली. व कायद्याची परिमाणकारक अंमलबजावणी वगैरे उपाययोजना सुचवल्या.
डॉ. मुकुंदराव गायकवाड यांनी त्यांच्या परदेशातील विविध दौऱ्यात अभ्यासलेल्या यशस्वी मॉडेल्सचा उल्लेख करून इस्त्राईल मध्ये 51% सरकार व 49 % शेतकरी अश्या गुंतवणुकीमधून “प्रथम कळस मग पाया” ह्या मूलमंत्राचा उपयोग केला जातो असे सांगितले. प्रथम भक्कम मार्केटिंग व्यवस्था (सक्षम बाजारपेठ) व नंतर शेतीचे नियोजन करून शेतकऱ्यांच्या बांधावरच मालाचे संकलन केले जाते व पुढे निर्यातीपर्यंतचे निर्णय स्वतंत्र अभ्यास गटा मार्फत राबविले जातात. शेतकऱ्याने स्वतःच स्वतःला सक्षम करण्यावर त्यांचा भर असून आधुनिक तंत्रज्ञान, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, ऑनलाईन वगैरे मार्फत कौशल्याचे प्रशिक्षण देऊन, शेतकऱ्यांच्या खिशात कसा पैसा खेळेल ह्याचे रहस्य सांगितले.
कृषिरत्न डॉ. बुधाजीराव मुळीक ह्यांनी सरकारवर अवलंबून राहिलो ही मोठी चूक केली अशी कबुली दिली. भूमाता शेतकरी कर्ज मुक्ती अभियान फार पूर्वीपासून सुरु केल्याचे सांगून किसान क्रांती संपाबाबत तपशीलवार माहिती दिली. शेती उत्पन्नातील जोखीमीचे व्यवस्थापन इर्मा कायदा (Income Risk Management in Agriculture- IRMA) बाबत भूमिका मांडली.
डॉ. कुमार सप्तर्षीनी ‘अहिंसा’ हेच आंदोलनाचे खरे शस्त्र असल्याचे सांगितले. अन्याय करणाऱ्या प्रतिपक्षाला शत्रू न मानता त्याला अभयदान दिले तर आंदोलन यशस्वी ठरते हे त्यांच्या प्रदीर्घ आंदोलनाच्या स्वानुभवातून नमूद केले. जातीव्यवस्थेवर त्यांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीतून आक्रमकपणे आसूड ओढले.
डॉ. सुजाता बरगाळे ह्यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा. अनंत काळे ह्यांनी समर्थपणे निभावून कार्यक्रमाचा दर्जा उंचावला. शेवटी कृषी व सहकार व्यासपीठ पुणे (यशवंतराव चव्हाण प्रतिष्टान ) चे संयोजक श्री शं. त्र. भिडे ह्यांनी आभार प्रदर्शन केले. उपस्थितांनी ही विचारांची व नवीन कल्पनांची मेजवानी होती अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. हा नावीन्यपूर्ण उपक्रम ही सुरुवात असून त्यातून एक ‘Think Tank’ निर्माण होऊन पुढील दिशा निश्चित केली जाईल असे श्री. बाबुलाल उदावंत ह्यांनी सांगितले.
Regards & Thanks
Satish Deshmukh, BE (Mech.)
President: Forum Of Intellectuals
G-65, Aditya Nagar, Gadital,
Hadapsar, Pune-411028.
Maharashtra State, India
जाहिरात
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर Live
वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111














