पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन- महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची संख्या आता 12 झाली आहे. पुण्यात 9, मुंबईत 3, ठाणे आणि नागपुरात एक कोरोनाबाधित रूग्ण सापडला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी आरोग्यसेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी पुरेशा प्रमाणात मास्क उपलब्ध आहेत याचा आढावा घ्यावा,’ अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या.
गुरुवारी मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयातून सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सकांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, ‘रुग्णांची संख्या १२ झाली असून या सर्व रुग्णांमध्ये लक्षणे कमी प्रमाणात जाणवत आहेत.
दरम्यान, ‘पर्यटनस्थळे, धार्मिक ठिकाणे येथे गर्दी नियंत्रण करताना व्यापक प्रमाणावर जनजागृती करावी. करोनाचे संकट उंबरठ्यापर्यंत आले आहे मात्र त्याला आत येऊ न देण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करूया, असे आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले.
विलगीकरण कक्षाची सुविधा
यात्रा, शासकीय कार्यक्रम पूर्णपणे रद्द करावेत. जे परदेशातून प्रवास करून आले आहेत त्यांनी 14 दिवसांपर्यंत घरीच थांबावे. आंतरराष्ट्रीय विमानतळे असलेल्या शहरांमध्ये विलगीकरण सुविधा तातडीने निर्माण करावी. जिल्हाधिकाऱयांनी आरोग्य सेवा देणाऱया कर्मचाऱयांसाठी पुरेशा प्रमाणात मास्क उपलब्ध व्हावेत याचा आढावा घ्यावा. प्रत्येक शहरातील टुर ऑपरेटर्सनी परदेश प्रवास केलेल्या आणि सध्या परदेशात असलेल्या प्रवाशांची यादी प्रशासनाला द्यावी, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.
यात्रा-धार्मिक कार्यक्रम रद्द
पुढील किमान 15 ते 20 दिवस शहरांमधील धार्मिक कार्यक्रम, यात्रा रद्द करण्याबाबत विविध संस्थांना विनंती करा, लोकांना प्रशिक्षित करा. कोरोनाच्या संशयित रुग्णांची ओळख, त्यांचे विलगीकरण या बाबींवर भर द्या, अशा सूचना मुख्य सचिवांनी यावेळी केल्या.

