पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून आज विधान परिषदेमध्ये आमदारकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आज त्यांच्यासोबत पत्नी रश्मी ठाकरे, मुलगा आदित्य ठाकरे उपस्थित होते.
आज उद्धव ठाकरे यांच्यासोबत महाविकास आघाडीच्या 4 अन्य उमेदवारांनी देखील आपला अर्ज दाखल केला आहे. यामध्ये शशिकांत शिंदे, निलम गोर्हे, राजेश राठोड, अमोल मिटकरी यांचा समावेश आहे. दरम्यान महाराष्ट्रात 21 मे दिवशी विधान परिषद निवडणूक पार पडणार आहे. ही निवडणूक बिनविरोध होणार आहे. शिवसेनेकडून उद्धव ठाकरे यांच्या पाठोपाठ डॉ. निलम गोर्हे या उमेदवार आहेत. महाराष्ट्रात विधान परिषद निवडणूक 9 जागांसाठी होणार आहे.
विधानसभेसाठी चार जागा भाजप आणि पाच जागा शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या युतीसाठी देण्यात येणार आहे. ठाकरे कुटुंबाकडून आदित्य ठाकरे पाठोपाठ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आमदार म्हणून सक्रिय राजकारणात हा प्रवेश आहे. दरम्यान 28 नोव्हेंबर दिवशी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. आता त्यांना पुढील सहा महिन्यात आमदारकी मिळवणं गरजेचे होतं. त्यासाठी कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर विधनपरिषद निवडणूक न घेता त्याच्या ऐवजी राज्यपाल नियुक्तीने त्यांची नेमणूक व्हावी असा प्रयत्न झाला होता. मात्र त्यामध्ये काही तांत्रिक चूका दाखवत नियुक्ती ऐवजी निवडणूक घेण्याचा निर्णय झाला.


