👁 8 Views

स्पर्धा परीक्षेत इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्यांना अधिक संधी – नूतन आय.ए.एस. राहुल चव्हाण… नूतन आय.ए.एस. अधिकारी राहुल चव्हाण यांची स्वेरी अभियांत्रिकीला सदिच्छा भेट

 पंढरपूर- ‘युपीएससी स्पर्धा परीक्षा देण्याच्या हेतूने पुण्यातील ॲकॅडमी मध्ये प्रवेश घेतला. पदवी शिक्षण घेत असतानाच सीबीएससी व  एनसीईआरटी च्या पुस्तकांच्या अभ्यासावर भर दिला. पुढे अधिक अभ्यास करण्यासाठी दिल्लीला गेलो आणि दोन परीक्षा तेथूनच दिल्या परंतु अपेक्षित यश आले नाही. तरीपण दुःखी, निराश न होता झालेल्या चुका दुरुस्त करायचे ठरवून पुण्यात येऊन पुन्हा प्रयत्न सुरु केले. भूतकाळात झालेल्या चुका समजून घेतल्याने पुढील अभ्यास योग्य दिशेने सुरू केला. त्यामुळेच आज यशस्वी झालो. युपीएससी स्पर्धा परीक्षेच्या इंटरव्यू साठी खूप तयारी केली होती.  एकंदरीत अभ्यासातून  एक गोष्ट लक्षात आली की स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्याची इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्यांना अधिक संधी असते.’ असे प्रतिपादन नुकतेच आय.ए. एस. उत्तीर्ण झालेले अधिकारी राहुल चव्हाण यांनी केले.

       युपीएससी स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश मिळवून पंढरपूर तालुक्यातील खर्डीचे नाव भारताच्या नकाशात अधिक ठळकपणे कोरलेले नूतन आय.ए. एस.अधिकारी राहुल चव्हाण यांनी स्वेरीला सदिच्छा भेट दिली. या भेटी प्रसंगी आपल्या यशाचे गमक ते उलगडत होते. प्रारंभी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आकाशाला गवसणी घालून आणि यशस्वी होऊन विद्यार्थ्यांना एक नवप्रेरणा देणारे कार्य केल्याबद्धल नूतन आय. ए. एस. अधिकारी राहुल चव्हाण यांचा सत्कार संस्थेचे स्वेरीचे अध्यक्ष नामदेव कागदे यांच्या हस्ते करण्यात आला.



 प्रा. सचिन गवळी यांनी प्रास्ताविक केले तर संस्थेचे संस्थापक सचिव व इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी पाहुण्यांना सर्वांची  ओळख करून दिली. पुढे बोलताना राहुल चव्हाण म्हणाले की ‘माझे पहिली ते चौथी पर्यंतचे प्राथमिक शिक्षण हे जवळच असलेल्या निकम वस्तीवर झाले. पुढे सातवीपर्यंतचे शिक्षण हे माझ्या खर्डी गावातच झाले. गोपाळपूर येथे स्वेरीचे तंत्रशिक्षण संकुल उभारून नवीन शैक्षणिक क्रांती केल्यामुळे  डॉ. रोंगे सर हे लहानपणापासूनच माझे आदर्श होते. त्यामुळे त्यांच्या सांगण्याने पुढील  शिक्षण हे कवठेकर शाळेत पूर्ण केले. अत्यंत कठोर परिश्रम आणि जिद्द बाळगल्यामुळे दहावीला ९५ टक्के तर बारावीला ७५ टक्के गुण मिळाले. स्पर्धा परीक्षेचा तिसरा प्रयत्न ज्यावेळेस सुरू होता त्यावेळी मला डेंग्यु आजार झाला होता. अंगात प्रचंड ताप देखील होता. लक्ष विचलित होत होते पण मी एकाग्रता ढळू दिली नाही. अखेर या परीक्षेचा निकाल चार तारखेला लागला आणि भारतात १०९ व्या रँकने यशस्वी झालो. ज्यावेळी निकाल समजला त्यावेळी देखील मी अभ्यास करतच होतो. परीक्षा झाली, यशस्वीही झालो आता खऱ्या अर्थाने पुढील आव्हाने येथून सुरू होणार आहेत.

 मी यशामुळे जरी आनंदी असलो तरी समाजासाठी मला आणखी चांगले कार्य करायचे आहे.’ यावेळी उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांची त्यांनी समर्पक उत्तरे दिली.आभार प्रदर्शन करत असताना स्वेरीचे माजी संस्थापक अध्यक्ष डॉ.अरुण गायकवाड म्हणाले की ‘सध्याची तरुण पिढी वाया गेलेली आहे असे आपण म्हणतो परंतु तरुण पिढी किती महान कार्य करू शकते याचे उत्तम उदाहरण म्हणजे हे राहुल चव्हाण आहेत. तरुणांनी योग्य दिशा पकडली तर भारत नक्कीच एक महाशक्ती होईल.’ यावेळी कल्याण चव्हाण, समाधान गाजरे, स्वेरीचे विश्वस्त एच.एम. बागल, विश्वस्त बी.डी.रोंगे, विश्वस्त प्रा.सुरज रोंगे, डॉ.स्नेहा रोंगे, सर्व अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक तसेच शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *