👁 8 Views

शाश्वत ग्रामीण विकासासाठी माती, पाणी व पर्यावरणाबाबत जागृती आवश्यक

स्वेरीचा रौप्य वर्षारंभीचा विशेष कार्यक्रम थाटात संपन्न

पंढरपूर- ‘महाराष्ट्राला अध्यात्मिक, सामाजिक, राजकीय  शैक्षणिक, कला व  क्रीडा यांची उज्ज्वल परंपरा लाभली असून अनेक मोठमोठी मंडळी पंढरपूरला आवर्जून भेट देतात. एखाद्या संस्थेचा विचार करताना त्या संस्थेच्या उभारणी मागचा हेतू फार महत्वाचा असतो. शिक्षणाला संस्कारांची जोड देणे आवश्यक आहे. महाराष्ट्रातील विद्यार्थी देशात जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत मोठ्या पदांवर कार्यरत आहेत आणि ते फार चांगले काम करत आहेत. स्वेरीची शैक्षणिक वाटचाल पाहिली तर असे लक्षात येते कि या संस्थेची स्थापना ग्रामीण भागात तंत्रशिक्षणाचा प्रसार करण्यासाठी झाली आहे आणि एकूणच स्वेरीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल होत आहे. आज एमपीएससी व यूपीएससी मध्ये यशस्वी होणारे ७०% विद्यार्थी हे इंजिनिअर्स आहेत. आजच्या तरुण पिढीवर मोबाईलच्या अतिवापराचे अनेक दुष्परिणाम होत असल्याचे दिसून येत आहेत.  आज निरोगी आणि निर्व्यसनी मुले ज्या घरात आहेत ते घर सध्या सर्वात श्रीमंत आहे. आज मानवाच्या अधिकाधिक पैसा मिळवण्याच्या हव्यासामुळे माती, पाणी आणि पर्यावरण यांचे संतुलन बिघडले आहे. ज्या देशाला पाण्याचा आणि मातीचा इतिहास नाही तो सिंगापूर देश आज  जगाला पाणी नियोजन व व्यवस्थापन कसे करावे, यावर धडे देत आहे. त्यामुळे  ‘शाश्वत ग्रामीण विकासासाठी माती, पाणी व पर्यावरणाबाबत जागृती आवश्यक आहे.’ असे प्रतिपादन कृषी व ग्रामविकासाचे उत्कृष्ट मॉडेल म्हणुन विश्वात प्रसिद्ध असलेल्या हिवरे बाजार (जि. अहमदनगर) चे माजी सरपंच पद्मश्री पोपटराव पवार यांनी केले. 

          गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचालित अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षातील पदार्पणा निमित्ताने आयोजिलेल्या विशेष कार्यक्रमात पद्मश्री पोपटराव पवार हे ‘कृषी आधारित ग्रामविकासात युवकांचे योगदान व पाणी व्यवस्थापन’ या विषयावर मार्गदर्शन करत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुण्यातील ब्रिगेडीयर बोधेज् करिअर इन्स्टिट्यूटचे संचालक निवृत्त ब्रिगेडीयर डॉ. सुनील बोधे हे होते. यावेळी पद्मश्री पवार यांनी ‘राष्ट्रप्रेमी व निसर्गप्रेमी तरुणांची देशाला गरज आहे’ तर ब्रिगेडीयर डॉ. बोधे यांनी ‘जय जवान जय किसान, हेच खरे देश समृद्ध करणारे’ असा संदेश दिला. प्रारंभी पंढरपुरचे ऋषितुल्य व्यक्तिमत्व असलेले माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांच्या द्वितीय पुण्यतिथी निमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व शिवसंग्रामचे अध्यक्ष व आमदार स्व. विनायक मेटे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करून प्रास्ताविकातून स्वेरीच्या  सुरुवाती पासूनच्या वाटचालीतील महत्वाची टप्पे, आदरणीय स्व. सुधाकरपंत परिचारक यांनी स्वेरीच्या स्थापनेवेळी दिलेला मूलमंत्र व त्यांचे योगदान, मिळालेली मानांकने, संशोधन निधी, विद्यार्थ्यांसाठी असणार्‍या सोईसुविधा, कमवा आणि शिका योजना, प्लेसमेंट मधील गरुडझेप आदी महत्त्वाच्या बाबी स्पष्ट केल्या. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील म्हणाले की, ‘रौप्य महोत्सवी वर्ष असल्यामुळे स्वेरीने आता तारुण्यात पदार्पण केले आहे. स्वेरीचा प्रवास पाहिला असता भविष्यात स्वेरीची व विद्यार्थ्यांची नक्कीच दुपटीने प्रगती होईल. याच विद्यार्थ्यांमधून पुढे उद्योजक तयार व्हावेत. विद्यार्थ्यांनी पुण्या- मुंबईला जाण्याऐवजी एकत्र येवून पंढरपुरला औद्योगिक दर्जा देण्यासाठी प्रयत्न केल्यास या भागाच्या विकासाला नक्कीच हातभार लागेल. या दृष्टीने आपण पाऊल टाकणे गरजेचे आहे. पैसे असणारे मोठी कामे सहज करू शकतात परंतु पैसे नसताना अशी मोठी झेप मारणारेच इतिहास घडवतात.’ असे सांगून त्यांनी अनेक उद्योजकांची उदाहरणे दिली. पुढे बोलताना पद्मश्री पोपटराव पवार म्हणाले की, ‘तरुणांचे ‘दिल’ आणि ‘दिमाग’ योग्य पद्धतीने चालले तरच भविष्य उज्ज्वल आहे आणि शिक्षणाला  संस्काराची जोड नसेल तर आपण खऱ्या अर्थाने विनाशाकडे जातोय, असे समजावे. मला कार्यातून मिळालेला पद्मश्री अवॉर्ड हा तमाम सरपंचांचा सन्मान आहे. हिवरे बाजारमध्ये ३५ वर्षांनी यंदा निवडणूक लागली. याचा इतिहास पाहिला असता तर पाणी आणि माती याची नाळ हिवरेबाजारने जोडल्यामुळे आज देशातच नाही तर जगामध्ये हिवरेबाजार ची ओळख झाली आहे. राज्याने एनसीसी व एनएसएस हे विषय सक्तीचे करावे कारण याच्यामुळे विद्यार्थी मानसिकदृष्ट्या व शारीरिक दृष्ट्या सक्षम होतात आणि भक्कम मनाची माणसे देशाचे उत्तम संरक्षण करतात.’ असेही त्यांनी स्पष्ट केले. अध्यक्षीय मनोगतात ब्रिगेडीयर डॉ. सुनील बोधे म्हणाले की, ‘स्वेरीच्या व्यवस्थापनाचे नेतृत्व, प्राध्यापकांचे परिश्रम यामुळे विद्यार्थ्यांच्या कष्टाला मधुर फळे लागत आहेत. ज्यांचा इतिहास अत्यंत संघर्षपूर्ण असतो त्यांचा भविष्यात उज्वल असतो. संपूर्ण राज्यातून विद्यार्थी स्वेरीत येतात आणि परिश्रमाने गुणवत्ता मिळवतात. त्यामुळे देशाच्या जडणघडणीत स्वेरीचे कार्य अतिशय उत्तमपणे सुरु आहे. आर्मीमध्ये शेतकऱ्यांची मुले अधिक सहभागी व्हावीत. देशाचे रक्षण आणि शेती हे ऑनलाइन होत नाही. त्यासाठी कठोर परिश्रमाची गरज आहे आणि शेतकऱ्यांची मुले अधिक परिश्रम करत असतात असे जाणवते. यावेळी बेस्ट ओऊट गोइंग स्टुडंट, गुणवंत विद्यार्थी व पीएच.डी. प्राप्त केलेल्या प्राध्यापकांचे पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले. सायंकाळी कवी अरुण म्हात्रे, शिवाजी सातपुते, इंद्रजीत घुले व कवयित्री लता ऐवळे  यांच्या ‘जागर माय मातीचा’ या काव्य मैफिलीत स्वेरी परिवार न्हावून गेला. या प्रसंगी पंढरपूर तालुका व आसपासचे शेतकरी, सरपंच, ग्रामसेवक, विठ्ठल कारखान्याच्या  व्हाईस चेअरमन व स्वेरीच्या विश्वस्त सौ.प्रेमलता रोंगे, गोपाळपूरचे सरपंच विलास मस्के, ग्रामसेवक दानोळे, भारुडकार सौ. चंदाताई तिवाडी, आर्कीटेक्ट कोंडा, सरपंच संघटनेचे आदिनाथ देशमुख, तांबे, अॅड.दत्तात्रय खडतरे, सौ. सुनिता बोधे, मोहन अनपट, शिवाजी आसबे, भालेराव, के.बी.पी. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.कांबळे, डॉ.साळुंखे, विविध गावचे सरपंच यांच्यासह प्रशासकीय, खाजगी, वैद्यकीय, शैक्षणिक, कृषी, क्रीडा, राजकीय, सामाजिक आदी क्षेत्रातील मान्यवर, निवृत्त अधिकारी, तसेच संस्थेचे अध्यक्ष नामदेव कागदे, उपाध्यक्ष अशोक भोसले, संस्थेचे माजी अध्यक्ष व विश्वस्त प्रा. सी.बी. नाडगौडा, संस्थेचे माजी अध्यक्ष व विश्वस्त धनंजय सालविठ्ठल, संस्थेचे माजी अध्यक्ष व विश्वस्त विजय शेलार, संस्थेचे माजी उपाध्यक्ष व विश्वस्त आर.बी.रिसवडकर, विश्वस्त एन.एम.पाटील, विश्वस्त एस.टी.राऊत, विश्वस्त एच.एम.बागल, विश्वस्त बी.डी. रोंगे, युवा विश्वस्त प्रा. सुरज रोंगे, इतर पदाधिकारी, कॅम्पस इन्चार्ज प्रा. एम.एम.पवार, स्वेरी अंतर्गत असलेल्या महाविद्यालयाचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, विद्यार्थी व पालक, ग्रामस्थ आदी उपस्थित होते. प्रा.यशपाल खेडकर यांनी सूत्रसंचालन केले तर स्वेरीचे जेष्ठ संस्थापक विश्वस्त दादासाहेब रोंगे यांनी आभार मानले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *