उत्तर प्रदेशात लखनौमध्ये लग्न सोहळ्याचा क्षण काही सेकंदात उद्ध्वस्त झाला. वधूनं नवरदेवाला वरमाला घालताच तिचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. मलिहाबाद क्षेत्रातील भदवाना गावातील ही घटना आहे.
राजपाल यांची मुलगी शिवांगी हिचा विवाहसोहळा होता. बुद्धेश्वर येथून नवरदेवाची वरात आलीहोती.
लग्न सोहळ्यात सगभागी झालेल्या सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद होता. वऱ्हाडी मंडळींचं जेवण सुरू झालं होतं. स्टेजवर वधू आणि वराचा वरमाला घालण्याचा विधी सुरू होता.
वर आणि वधू एकमेकांसमोर उभे होते. नवरदेवानं वधू शिवांगीच्या गळ्यात साताजन्माची सात देण्याचं वचन देत वरमाला घातली. त्यानंतर शिवांगीची वरमाला घालण्याची वेळ आली. शिवांगीनं जसं नवरदेव विवेकच्या गळ्यात वरमाला घातली तशीच ती जागीच कोसळली. यानंतर एकच गहजब झाला.
शिवांगी खाली कोसळताच तिला रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं. पण रुग्णालयात पोहोचण्याआधीच तिचा मृत्यू झाला होता. शिवांगीला हार्टअॅटक आल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. शिवांगीच्या मृत्यूची माहिती मिळताच संपूर्ण विवाहसोहळ्यावर शोककळा पसरली.
लग्न सोहळ्यात सर्वांच्या चेहऱ्यावर जो आनंद होता तो एका क्षणात नाहीसा झाला होता. शिवांगीच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनाही जबर धक्का बसला आहे. कुटुंबातील व्यक्तींचं रडणं काही केल्या थांबत नाहीय. शिवांगीची आई कमलेश कुमारी, दुसरी मुलगी सोनम आणि भाऊ अमितसह कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.





