अमरावती: ‘ती फक्त आणि फक्त माझीच आहे तिच्यावर अन्य कुणाचाही हक्क नाही’, असे म्हणत एका बालपणीच्या मित्राने दुसऱ्या मित्राचा गळा चिरल्याची घटना शहरातील बायपास रोडवरील हॉटेल लॉर्डस् जवळ दुपारच्या सुमारास घडली. जखमी युवकाचे नाव रुद्रेश उर्फ अजय शैलेश दीक्षित असे आहे. तर हल्लेखोर युवक हर्ष अशोक शर्मा रा. गाणुवाडी या युवकाला राजापेठ पोलिसांनी अटक केली आहे.
रुद्रेश व हर्ष आणि एक युवती हे तिघेही बालपणापासून सोबत शिकले होते. त्यामुळे त्यांच्यामध्ये चांगली मैत्री होती. परंतु पुढे महाविद्यालय शिक्षणाकरिता त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी प्रवेश घेतला होता. दरम्यान युवती आणि हर्ष यांच्यात प्रेम संबंध जुळले होते. त्यामुळे ते वारंवार भेटत होते. परंतु इकडे रुद्रचे सुद्धा त्याच युवतीवरती प्रेम जडले होते. तो तिला भेटण्यासाठी बोलवायचा. परंतु ती रुद्रेशला टाळत होती. त्यामुळे रुद्रेश त्या युवतीला पाठलाग करून त्रास देत होता.
रुद्रेशच्या या त्रासाला कंटाळून युवतीने तिच्या प्रियकराला हा सगळा प्रकार सांगितला. दरम्यान हर्शने रुद्रेशला “ती फक्त माझी आहे ” असे वारंवार सांगितले. यावरून त्यांच्यात काही वेळा झटापटीही झाल्या. परंतु रुद्रेशने मात्र युवतीचा पिच्छा पुरवला.
वेळा तर त्याने आपल्या कॉलेजच्या मुलांना सोबत घेऊन हर्षवर हल्ला सुद्धा केला. त्यामुळे त्या दोघांचे संबंध चांगलेच ताणले गेले होते. रुद्रेशच्या त्रासाला कंटाळून आज दुपारच्या सुमारास हर्ष चायना नेलकटर घेऊन रुद्रच्या घराकडे निघाला. तेव्हा रुद्रेश घरातून बाहेर निघाला. तेव्हा हॉटेल लॉर्ड्स जवळ हर्षने त्याला थांबवले आणि नेलकटरच्या चाकूने त्याचा गळा चिरला. गळ्यातून रक्तस्त्राव होताच रुद्रेश घाबरला आणि जीव वाचवित पळत असताना जाणाऱ्या वाहतूक शाखेच्या दोन कर्मचाऱ्यांना रुद्रेश जखमी अवस्थेत दिसला. त्यांनी दुसरा वार करण्याआधीच हर्षला पकडून त्याच्या हातातून नेलकटर घेतले. पोलिसांनी जखमी रुद्रेशला जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवले आहे तसेच राजापेठ पोलिसांना माहिती दिली आहे.



