पांगरी: लग्नाच्या हळदीचा कार्यक्रम आटोपून घरी परतणाऱ्या दोन तरुण फोटोग्राफर्सची दुचाकी घसरून अपघात झाला. या अपघातात दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी रात्री सव्वा बाराच्या सुमारास बार्शी- लातूर महामार्गावरील चिंचोली (ता.बार्शी) शिवारात नाना चौधरी यांच्या शेताजवळ घडली.
या अपघातात सूरज पांडुरंग माळी (वय २०, रा. पांगरी) आणि रविकिरण रवींद्र शिंदे (वय २५, रा. चिंचोली) या दोघांचा मृत्यू झाला. याबाबत सुयश सुहास शिंदे (वय २६, रा. चिंचोली) यांनी पांगरी पोलिसांत खबर दिली.
सुयश शिंदे हे लग्न कार्यानिमित्त शेतीतील वस्तीवरून घरी जात होते. त्यावेळी बार्शी- लातूर महामार्गाच्या कडेला मोटारसायकल घसरून पडलेली दिसली. त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता, दुचाकी (एमएच १३ ईक्यू ८६५८) घसरल्याने सूरज माळी आणि रविकिरण शिंदे गंभीर जखमी अवस्थेत पडले होते.
तातडीने १०८ रुग्णवाहिकेच्या मदतीने त्यांना पांगरी येथील ग्रामीण रुग्णालयात हलवले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. या घटनेची नोंद पांगरी पोलीस ठाण्यात झाली असून पुढील तपास पोलीस हवालदार गणेश दळवी करत आहेत.


