संगमनेर: पुणे येथून कारमधून नाशिकला लग्नासाठी जात असताना पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील माळवाडी शिवारात (बोटा, ता. संगमनेर) अपघात होवून पती-पत्नीचा मृत्यू, तर एकजण गंभीर जखमी झाला आहे.
घटना प्रजासत्ताक दिनी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास घडली आहे. यामध्ये कारचा चक्काचूर झाला आहे.
घारगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की पुणे शहरातील गुरुवार पेठ-दरेकरवाडा येथील सचिन वसंतराव दरेकर (वय ५७), रमा सचिन दरेकर (वय ५३), सीमा सुरेंद्र देशमुख व सुरेंद्र देशमुख रविवारी पहाटे साडेपाच वाजता कारमधून नाशिकला लग्नासाठी चालले होते.
दरम्यान, पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील माळवाडी शिवारात आले असता अपघात झाला. त्यानंतर त्यांना उपचारासाठी आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात हलविले होते. मात्र, सचिन व रमा दरेकर दोघे उपचारांपूर्वीच मृत पावल्याचे घोषित केले, तर गंभीर जखमी सीमा देशमुख यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या घटनेची माहिती मिळताच तत्काळ घारगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दिगंबर भदाणे, प्रमोद गाडेकर, सुभाष बोडखे, साईनाथ दिवटे यांनी अपघातस्थळी धाव घेतली. याप्रकरणी मयत सचिन दरेकर यांचे भाऊ सतीश वसंतराव दरेकर यांनी दिलेल्या खबरीवरून घारगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक कल्पेश दाभाडे करत आहेत.


