सांगली: सांगली शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या बसस्थानकासमोर एका मोबाईल दुकानदाराचा खून झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. अवघ्या ५० रुपयांच्या वादातून तीन ते चार जणांनी दुकानदारावर चाकुने सपासप वार केले आहेत.
हा हल्ला इतका भयंकर होता की दुकानदाराचा रक्ताच्या थारोळ्यात पडून जागीच मृत्यू झाला. हत्येची ही घटना समोर आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतलं आहे. तिन्ही आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती आहे.
विपूल अमृतपुरी गोस्वामी असं खून झालेल्या मोबाईल दुकानदार तरुणाचं नाव आहे. सांगली शहरातल्या मध्यवर्ती बस स्थानकाबाहेर ‘भैरवनाथ’ मोबाईल शॉपी आहे. याच ठिकाणी त्याचा खून झाला आहे. घटनेच्या दिवशी काही तरुण गोस्वामी याच्या दुकानावर मोबाईलचे स्क्रीन गार्ड खरेदी करण्यासाठी आले होते. यावेळी विपुलने मोबाईल स्क्रीन गार्डची किंमत शंभर रुपये असल्याचं सांगितलं.
पण मोबाइल स्क्रीन गार्ड केवळ पन्नास रुपयांना मिळत, असं सांगत स्क्रीनगार्ड खरेदी करायला आलेल्या तरुणांनी गोस्वामीसोबत वाद घालायला सुरुवात केली. हा वाद इतका विकोपाला गेला की दुकानावर आलेल्या चार तरुणांनी थेट विपुलवर धारदार शस्त्रांनी वीस ते पंचवीस वार केले. हा हल्ला इतका भयंकर होता, की विपुलचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळतात शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली असता विपूल रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. पोलिसांना विपूलचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. याप्रकरणी सांगली शहर पोलिसांनी तीन अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतलं आहे. एक आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.


