सांगली: विट्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शासकीय निवासी शाळेमधील 23 हून अधिक विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. जेवण जेवल्यानंतर विद्यार्थ्यांना मळमळ, उलट्यांचा त्रास होऊ लागल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना तातडीनं विटा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सर्व मुलांची प्रकृती स्थिर असून सर्व विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत.या प्रकारामुळे पालक संतप्त झाले आहेत
सांगलीत जेवणातून 23 मुलांना विषबाधा झाल्याची घटनेमुळे विटा परिसरात खळबळ उडाली आहे. विटयातील समाजकल्याण विभागाच्या शासकीय निवासी शाळेत एकूण 93 विद्यार्थी शिकतात. रविवारी रात्री शाळेकडून 49 मुलांना जेवण देण्यात आले. जेवल्यानंतर मुलांना आज सोमवारी सकाळपासून उलटी, मळमळ, जुलाबाचा त्रास सुरु झाला. एकाचवेळी 23 मुलांना त्रास सुरु झाल्यामुळे शाळा प्रशासनाने तातडीनं मुलांना विटा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास पोटदुखी उलटीचा त्रास होऊ लागल्याने शासकीय निवासी शाळेतील 5 मुलांना घेऊन उपचारासाठी विटा ग्रामीण रुग्णालयात घेऊन आले होते. त्यानंतर डॉक्टराना शंका आल्याने मुलाकडून चौकशी केली असता रात्री खालेल्या जेवणातील मटणातून विषबाधा झाली असल्याचे निष्पन्न झाले असून त्या 23 मुलांवर विटा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
जेवणातून विषबाधा झाल्याचे उघड झाल्याने विद्यार्थ्यांचे पालक संतापले आहेत.जेवणातून विषबाधा होण्याचे प्रकार अलीकडे वाढल्याचं दिसत असताना पालकांमध्ये घबराट पसरू लागली आहे.


