पंढरपूर Live 12-12- 2017
देशाचे नेते व महाराष्ट्राचे जाणते राजे ‘खा. शरदचंद्रजी पवार साहेब’
माजी केंद्रीय कृषीमंत्री, राष्ष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा यांचा खा. मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांचा दि.. 12-12-2017 रोजी वाढदिवस. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेतेमंडळी व कार्यकर्त्यांसह महाराष्ष्ट्रातील तमाम मराठी युवकांसाठी प्रेरणादायी ठरणारा हा दिवस… यानिमित्त महाराष्ट्राच्याया जाणत्या राजाच्या झंझावाती जीवनप्रवासावर टाकलेला हा प्रकाशझोत.
शरदचंद्र गोविंदराव पवार यांचा जन्म 12 डिसेंबर 1940 रोजी झाला. इ.स. 1978 ते इ.स. 1980, इ.स. 1988 ते इ.स. 1991 व इ.स. 1993 ते इ.स. 1995 या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्रातील मुख्यमंत्री होते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षापासून फुटून इ.स. 1999 साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
खा. शरदचंद्रजी पवार साहेबांचा जन्म डिसेंबर 12, इ.स. 1940 रोजी पुणे जिल्ह्यातील बारामती येथे झाला. इ.स. 1956 साली ते शाळेत असताना त्यांनी गोवामुक्ती सत्याग्रहाला पाठिंबा दर्शविण्यासाठी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित केला. येथून त्यांच्या राजकीय जीवनाची सुरवात झाली.त्यानंतर काँलेजमध्ये असताना विद्यार्थी संघटनेचे नेते म्हणूनही त्यांनी काम पाहिले.विद्यार्थी संघटनेच्या एका समारंभासाठी त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना आमंत्रित केले.पवारांनी त्याप्रसंगी केलेल्या भाषणामुळे यशवंतराव चव्हाण अतिशय प्रभावीत झाले.त्यानंतर चव्हाणांच्या सांगण्यावरून पवारांनी युवक काँग्रेसमध्ये प्रवेश केला. चव्हाणांनी पवारांच्यातील सुप्त नेता हेरला आणि त्यानंतर पवार त्यांचे शिष्य बनले. त्यानंतर चव्हाणांनी त्यांच्या पुणे शहराला दिलेल्या भेटींदरम्यान पवारांना मुद्दाम भेटायला बोलावून त्यांना अनेकवेळी मार्गदर्शन केले. वयाच्या 24 व्या वर्षी ते महाराष्ट्र राज्य युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले. त्यानंतर यशवंतराव चव्हाणांचा राजकीय वारसदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाऊ लागले.
इ.स. 1966 साली पवारांना युनेस्को शिष्यवृत्ती मिळाली.त्याअंतर्गत त्यांना पश्चिम जर्मनी, फ्रान्स, इटली, इंग्लंड इत्यादी देशांना भेट देऊन तेथील राजकीय पक्षांचा आणि त्यांच्या पक्षबांधणी करायच्या पद्धतीचा जवळून अभ्यास करता आला.
विधानसभा
सर्वप्रथम इ.स. 1967 च्या राज्य विधानसभा निवडणुकीत ते बारामती मतदारसंघातून विजयी झाले. श्री. वसंतराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात त्यांचा राज्यमंत्री म्हणून समावेश वयाच्या 29व्या वर्षी झाला. इ.स. 1972 आणि इ.स. 1978 सालच्या निवडणुकीतही ते विजयी झाले. इ.स. 1978 सालच्या निवडणुकीनंतर वसंतदादा पाटील मुखमंत्री झाले. यशवंतराव चव्हाणांबरोबरच वसंतदादा पाटील हेसुद्धा पवारांचे मार्गदर्शक होते. पण काँग्रेस पक्षाचे 12 आमदार फोडून पवारांनी विरोधी पक्षाबरोबर हातमिळवणी केली आणि वसंतदादांचे सरकार पाडले. त्यानंतर ’पवारांनी माझ्या पाठीत खंजीर खुपसला’ अशी जळजळीत प्रतिक्रिया वसंतरावांनी दिली व 1978 ला शरद पवार यांना पहिल्यांदा मुख्यमंत्री करण्यात सहकार महर्षी केशवराव सोनवणे यांचे फार मोठे योगदान होते याची त्यांनी आठवण ठेवली नाही. संदर्भ हवा
मुख्यमंत्री
18 जुलै इ.स. 1978 रोजी शरद पवारांचा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला. पवारांबरोबर काँग्रेस (इंदिरा) पक्षातून बाहेर पडलेले 12 आमदार, काँग्रेस (स) पक्ष आणि जनता पक्ष यांची आघाडी पुरोगामी लोकशाही दल या नावाने बनली आणि त्याचे नेते पवार झाले.ते राज्याचे सर्वांत तरुण मुख्यमंत्री होते. इ.स. 1980 साली इंदिरा गांधींचे सत्तेत पुनरागमन झाल्यानंतर त्यांनी विरोधी पक्षांची राज्य सरकारे बरखास्त केली. त्यात पवारांचे सरकारही बरखास्त झाले. जून इ.स. 1980 मध्ये विधानसभा निवडणुका झाल्या. काँग्रेस(इंदिरा) पक्षाने 288 पैकी 186 जागा जिंकल्या आणि बँरिस्टर अब्दुल रहमान अंतुले राज्याचे नवे मुख्यमंत्री झाले. शरद पवार विधानसभेतील प्रमुख विरोधी नेते होते.
लोकसभा
इ.स. 1984 सालची लोकसभा निवडणूक पवारांनी लढवली आणि ते लोकसभेवर निवडून गेले. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर निर्माण झालेल्या सहानुभूतीच्या लाटेत विरोधी पक्ष राज्यातील 48 पैकी केवळ 5 जागा जिंकू शकले. त्यात पवारांच्या बारामती या जागेचा समावेश होता .मात्र त्यांनी राष्ट्रीय राजकारणात न पडता काही काळ राज्याच्या राजकारणातच राहायचे ठरवले. मार्च इ.स. 1985 ची राज्य विधानसभा निवडणूक त्यांनी बारामतीतून जिंकली आणि लोकसभा सदस्यत्वाचा त्यांनी राजीनामा दिला. त्या विधानसभा निवडणुकीत पवारांच्या काँग्रेस(स) पक्षाने 288 पैकी 54 जागा जिंकल्या आणि पवार राज्यविधानसभेतील विरोधी पक्षनेते झाले.
परत विधानसभा
इ.स. 1987 साली 9 वर्षांच्या खंडानंतर शरद पवारांनी राजीव गांधींच्या उपस्थितीत औरंगाबाद येथे काँग्रेस(इंदिरा) पक्षात परत प्रवेश केला. जून 1988 मध्ये पंतप्रधान आणि काँग्रेस अध्यक्ष राजीव गांधींनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचा केन्द्रीय मंत्रिमंडळात अर्थमंत्री म्हणून समावेश केला. त्यांच्या जागी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून राजीव गांधींनी शरद पवारांची निवड केली. 26 जून इ.स. 1988 रोजी त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून दुसर्यांदा शपथ घेतली. त्यापूर्वीच्या काळात राज्यात काँग्रेस पक्षाला फारसे आव्हान नव्हते. पण बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेना हा पक्ष भारतीय जनता पक्षाशी युती करून काँग्रेस पक्षाच्या अनेक वर्षे अबाधित असलेल्या वर्चस्वाला आव्हान देऊ लागला होता. त्या आव्हानाला तोंड देऊन राज्यात काँग्रेस पक्षाचे वर्चस्व कायम राखण्याची जबाबदारी पवारांवर आली.
नोव्हेंबर इ.स. 1989 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने राज्यातील 48 पैकी 28 जागा जिंकल्या. पक्षाची राजस्थान,मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश यासारख्या राज्यांत झाली तशी वाताहत महाराष्ट्रात झाली नाही. पण इ.स. 1984 च्या तुलनेत पक्षाने 15 जागा कमी जिंकल्या. शिवसेनेने 4 जागा जिंकून प्रथमच लोकसभेत प्रवेश केला. भारतीय जनता पक्षाने 10 जागा जिंकून जोरदार मुसंडी मारली. लोकसभा निवडणुकीतील चांगल्या कामगिरीमुळे शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढला. राज्य विधानसभेसाठी फेब्रुवारी इ.स. 1990 मध्ये निवडणुका होणार होत्या. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी राज्याच्या कानाकोपर्यात प्रचारसभा घेऊन काँग्रेस पक्षापुढे मोठे आव्हान उभे केले. राज्य विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने 288 पैकी 141 तर शिवसेना-भाजप युतीने 94 जागा जिंकल्या. राज्याची स्थापना झाल्यानंतर प्रथमच काँग्रेस पक्षाने विधानसभेतील बहुमत गमावले. तरीही 12 अपक्ष आमदारांच्या पाठिंब्यावर शरद पवार यांनी 4 मार्च इ.स. 1990 रोजी मुख्यमंत्री म्हणून तिसर्यांदा शपथ घेतली.
जानेवारी इ.स. 1991 मध्ये विलासराव देशमुख, सुरूपसिंग नाईक आणि इतर काही मंत्र्यांनी शरद पवारांना मुख्यमंत्रिपदावरून हटवण्याची मागणी पक्षाध्यक्ष राजीव गांधी यांच्याकडे केली. पण त्याला राजीव गांधींनी नकार दिला.
इ.स. 1991 च्या लोकसभा निवडणुकीत पवारांनी काँग्रेस पक्षाचा राज्यात एकहाती प्रचार केला. पक्षाने राज्यात 48 पैकी 38 जागा जिंकल्या आणि इ.स. 1989 च्या निवडणुकीत झालेल्या पिछेहाटीची काही अंशी भरपाई केली. निवडणुक प्रचारादरम्यान राजीव गांधींची हत्या झाली. श्री.पी.व्ही.नरसिंह राव आणि अर्जुनसिंग यांच्याबरोबर पवारांचे नावही पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आहे अशा बातम्या वर्तमानपत्रांत आल्या. मात्र काँग्रेस संसदीय पक्षाने श्री.पी.व्ही.नरसिंह राव यांना नेतेपदी निवडले आणि त्यांचा 21 जून इ.स. 1991 रोजी भारताचे पंतप्रधान म्हणून शपथविधी झाला.
पुनः दिल्ली
नरसिंह रावांनी पवारांना केन्द्रीय मंत्रिमंडळात संरक्षणमंत्री म्हणून नेमले. 26 जून इ.स. 1991 रोजी त्यांचा केंद्रीय मंत्री म्हणून प्रथमच शपथविधी झाला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या जागी सुधाकरराव नाईक यांची निवड करण्यात आली. राज्य काँग्रेसमधील अंतर्गत मतभेदांमुळे सुधाकरराव नाईक यांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर नरसिंह रावांनी शरद पवारांना पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून नेमले. त्यांनी 6 मार्च इ.स. 1993 रोजी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून चौथ्यांदा सूत्रे हाती घेतली.
विधानसभा, चौथी खेळी
पवारांची मुख्यमंत्रिपदाची चौथी कारकीर्द अत्यंत वादग्रस्त ठरली. ते परत मुख्यमंत्री बनून एक आठवडा व्हायच्या आत, 12 मार्च इ.स. 1993 रोजी मुंबईत भीषण बाँबस्फोट झाले. त्यांत 257 लोक ठार तर 600हून अधिक लोक जखमी झाले. 30 सप्टेंबर इ.स. 1993 रोजी लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यांमध्ये भूकंप होऊन दहा हजारांपेक्षा जास्त लोक ठार झाले. या संकंटांबरोबरच राज्यात कमालीच्या वाढलेल्या भ्रष्टाचाराबद्दल मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त गो.रा.खैरनार यांनी पवारांना दोषी धरून त्यांच्यावर अनेक आरोप केले. प्रख्यात समाजसेवक अण्णा हजारे यांनी वनखात्यातील वाढत्या भ्रष्टाचाराविरोधात उपोषण केले. तेव्हा पवारांचे सरकार भ्रष्टाचारी अधिकार्यांना पाठीशी घालत आहे असा आरोप झाला. जळगाव येथील सेक्स स्कँडलमध्ये अनेक तरुणींवर लैंगिक अत्याचार झाले, त्यात काँग्रेस पक्षाचे स्थानिक नगरसेवक सामील आहेत असा आरोप झाला. 23 नोव्हेंबर इ.स. 1994 रोजी नागपूर येथे गोवारी समाजातील लोकांचा शिक्षण आणि सरकारी नोकर्यांमध्ये आरक्षणाची मागणी करण्यासाठी मोर्चा निघाला, त्यात चेंगराचेंगरी होऊन 123 लोक मृत्युमुखी पडले. त्यांच्या शिष्टमंडळाची आदिवासी कल्याण मंत्री मधुकरराव पिचड यांनी वेळेत भेट न घेतल्यामुळे चेंगराचेंगरीची दुर्दैवी घटना घडली असाही आरोप झाला.
राज्य विधानसभेसाठी फेब्रुवारी-मार्च इ.स. 1995 मध्ये निवडणुका होणार होत्या. त्या निवडणुकींच्या तिकिटवाटपात काँग्रेस पक्षात मोठया प्रमाणावर बंडखोरी झाली. अनेक ठिकाणी काँग्रेस नेत्यांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरुद्ध अपक्ष म्हणून निवडणुला लढवल्या.
जनतेत सरकारविरुद्ध वाढलेली नाराजी आणि मोठया प्रमाणावर झालेली बंडखोरी यांचे प्रतिबिंब मतपेटीत उमटले. काँग्रेस पक्षाचा राज्यात प्रथमच पराभव झाला.शिवसेना-भाजप युतीस 288 पैकी 138 जागा मिळाल्या तर काँग्रेस पक्षास 80 जागांवर समाधान मानावे लागले.राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून मनोहर जोशी यांचा 14 मार्च इ.स. 1995 रोजी शपथविधी झाला.
दिल्लीची तिसरी फेरी
इ.स. 1996च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत पवार राज्य विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते होते. इ.स. 1996 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी बारामतीतून विजय मिळवला आणि त्यानंतर ते राष्टीय राजकारणात उतरले. जून इ.स. 1997 मध्ये त्यांनी काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सीताराम केसरी यांच्याविरुद्ध निवडणूक लढवली पण तीत त्यांचा पराभव झाला.
इ.स. 1998च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी राज्यात रिपब्लिकन पक्ष आणि समाजवादी पक्षांबरोबर निवडणुकपूर्व आघाडी करायचा निर्णय घेतला.त्यामुळे शिवसेना-भाजप विरोधी मतांचे विभाजन टळले आणि काँग्रेस-रिपब्लिकन पक्ष आणि समाजवादी पक्ष यांच्या युतीने 48 पैकी 37 जागा जिंकून जोरदार यश प्राप्त केले.शिवसेना-भाजप युतीला 10 जागांवर समाधान मानावे लागले.त्यानंतर शरद पवार 12 व्या लोकसभेतील विरोधी पक्षनेते झाले.
12वी लोकसभा बरखास्त झाल्यानंतर मे इ.स. 1999मध्ये पी.ए.संगमा आणि तारिक अन्वर यांच्या साथीने शरद पवारांनी अशी मागणी केली की, ’13 व्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने इटलीत जन्मलेल्या सोनिया गांधींऐवजी भारतात जन्मलेल्या कोणाही नेत्याला पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित करावे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींना लिहिलेल्या पत्रात त्या तिघांनी म्हटले,’उच्च शिक्षण, कर्तबगारी आणि पात्रता असलेल्या अनेक व्यक्ती असलेल्या या 98 कोटी लोकांच्या भारत देशात भारताबाहेर जन्म झालेली कोणत्याही व्यक्तीने सरकारचे नेतृत्व करणे योग्य होणार नाही, कारण हा प्रश्न देशाची सुरक्षा, आर्थिक हितसंबंध आणि जागतिक राजकारणातील भारताच्या प्रतिमेबरोबरच प्रत्येक भारतीयाच्या अस्मितेशी निगडित आहे’ या कारणावरून काँग्रेस पक्षाने शरद पवार, पी.ए.संगमा आणि तारिक अन्वर यांना 6 वर्षांसाठी पक्षातून काढून टाकले.
राष्ट्रवादी
त्यानंतर 10 जून इ.स. 1999 रोजी शरद पवारांनी त्यांच्या ’राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची’ स्थापना केली. इ.स. 1999 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकींनंतर कोणत्याही पक्ष अथवा आघाडीस बहुमत मिळाले नाही.त्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी होऊन विलासराव देशमुख राज्याचे नवे मुख्यमंत्री झाले.
इ.स. 2004 मधील लोकसभा निवडणुकीनंतर पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष केंद्रात मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारमध्ये सामील झाला. 22 मे इ.स. 2004 मध्ये शरद पवारांनी देशाचे कृषिमंत्री म्हणून सूत्रे हाती घेतली. 29 मे इ.स. 2009 रोजी केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांना कृषी, ग्राहकांशी संबंधित बाबी, अन्न आणि सार्वजनिक वितरण ह्या खात्यांची धुरा देण्यात आली. जुलै इ.स. 2010मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर पक्षकार्याला अधिक वेळ देण्याची इच्छा असल्याचे सांगून पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्याकडे त्यांनी आपल्यावरील कार्यभार कमी करण्याची विनंती केली.
क्रिकेट
राजकारणाबरोबरच क्रिकेट हे देखील पवारांच्या आवडीचे क्षेत्र आहे. 29 नोव्हेंबर इ.स. 2005 रोजी ते भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी निवडून आले. 1 जुलै इ.स. 2010 रोजी त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. जगमोहन दालमिया यांच्यानंतर हे पद भूषविणारे ते दुसरे भारतीय आहेत.
शिक्षणसंस्थां्मधील सहभाग
पवारांचा शिक्षणक्षेत्राशीही सक्रिय संबंध आहे. त्यांनी ज्या शिक्षणसंस्थांच्या कामात सहभाग घेतला आहे, त्यातील महत्त्वाच्या शिक्षणसंस्था खालीलप्रमाणे –
विद्या प्रतिष्ठान, बारामती (इंग्लिश मजकूर)
कृषी विकास प्रतिष्ठान, बारामती (इंग्लिश मजकूर)
रयत शिक्षण संस्था, सातारा (इंग्लिश मजकूर)
वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट, मांजरी, पुणे (इंग्लिश मजकूर)
शिवनगर विद्या प्रसारक मंडळ, माळेगाव, बारामती (इंग्लिश मजकूर)
चरित्रे आणि आत्मचरित्र
लोकनेते शरदराव पवार (लेखक – राम कांडगे)
डहरीरव झरुरी – A चरीी ङशरवशी (लेखक – दीपक बोरगावे)
शरद पवार यांचे ’लोक माझे सांगाती’ नावाचे मराठी आत्मचरित्र आहे.
शरद पवार यांना मिळालेले पुरस्कारसंपादन
भारत सरकारचा पद्मविभूषण (2017)
महाराष्ट्राच्या भुमीत जन्म घेऊन खर्या अर्थाने छत्रपती शिवरायांप्रमाणेच रयतेच्या हितासाठी झिजत आलेल्या या महान नेत्यांना पंढरपूर लाईव्ह टीमकडून वाढदिवसाच्या मन:पूर्वक हार्दिक शुभेच्छा..! ।जीवेत शरद: शतम्।
14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर








